Monday, December 14, 2015

"स्वर कट्यार" काळजात घुसली

पुन्हा जन्मण्यासाठी द्यावा सूरसुधारस हो
सूर निरागस हो....

सदाशिव चा आर्त स्वर कानावर पडला आणि अचानक मला समोरचा पडदा दिसेनासा झाला....डोळ्यातुन घळाघळा पाणी यायला लागलं...संगीताच्या साधनेसाठी तळमळणारा सदाशिव गुरु ला आर्त साद घालतोय आणि एका क्षणापूर्वी आपल्या घराण्याची गायकी चोरली म्हणुन सदाशिवाला मारायला निघालेला खासाहेबांसारखा एक सच्चा कलाकार त्याचे सच्चे सूर ऐकुन अक्षरश: विरघळुन गेलेत.
इथे गुरु मोठा ? की शिष्य मोठा ? की घराणं मोठं ? असे प्रश्ण गौण आहेत....एका कलाकारासाठी सप्तसूर हेच अंतिम सत्य....मग त्यापुढे ईतके दिवस पांघरलेला खासाहेबांचा अहंकाराचा मुखवटा एका क्षणात गळुन पडतो...आणि खासाहेबांबद्दलचा सदाशिवाचा राग देखिल त्या सुरांच्या वर्षावात वाहुन जातो....
समोर पडद्यावर जे दिसतंय ती केवळ एक कथा आहे यावर कसा आणि का विश्वास ठेवायचा....राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार या सगळ्या भावना त्या एका संगीतकलेपुढे नतमस्तक होउन जातात. "कट्यार काळजात घुसली" हा फक्त एक चित्रपट न राहाता ती एक अनुभूती होउन बसते.
आपल्या संगीत घराण्याचा अतिशय अभिमान बाळगणारे खासाहेब माझ्यासाठी तरी या कथेचे व्हिलन नाहीत....सलग १४ वर्षे पंडीतजींकडुन झालेला त्यांचा पराभव त्यांना सहन होत नाही याचे कारण वैयक्तीक नाहीये. हा विजय त्यांना स्वतःसाठी नकोच आहे. तो त्यांना हवा आहे त्यांच्या घराण्यासाठी, त्यांच्या घराण्याच्या संगीतासाठी.ईतकं पराकोटीचं प्रेम आपल्या कलेवर फक्त एक सच्चा कलावंतच करु जाणे.केवळ पत्नीने केलेल्या कपटामुळे पंडीतजींचा आवाज गेला आणि आपण जिंकलो आहोत ही बोच त्यांच्या डोळ्यात आणि वागण्यात सतत दिसत राहाते.सदाशिवाच्या येणामुळे त्याचे रुपांतर भितीत होते.
संगीताप्रती जी निष्ठा खासाहेबांची तीच सदाशिवची.गुरुंकडुन विद्या मिळवण्यासाठी आलेला सदाशिव गुरुंचा आवाज गेल्याचं कळल्याने सैरभैर झालाय.शिकण्याची तळमळ तर आहे. पण गुरुच नाहीत. जमतील ते सर्व मार्ग अवलंबले पण गुरु नाही त्यामुळे आपण अपूर्ण आहोत ही भावना त्याला त्रास देतेय.खासाहेबांचा कितीही राग आला तरी त्यांच्याकडुन अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळत आहेत याची त्याला जाणीव आहे.आणि म्हणुनच गुलाम बनुन त्यांची सेवा करायची वेळ आली तरी तो त्याकडे सकारात्मक भावनेने पाहातो.
अखेरच्या द्रुष्यात कट्यार चालवण्यापूर्वी कला सादर करायची संधी मिळाल्यावर दोन्ही गुरुंकडुन मिळालेली गायकी सादर करतो आणि त्या दोन्हीचा मिलाफ करुन स्वतःची अशी शैली देखील सादर करुन दाद मिळवतो.
अंधकार गुरुविण जगी भासे
कंठी स्वर उरलेत जरासे
किरण बनुनी क्षितीजी प्रगटावे
वरुण बनुनी ह्रदयी बरसावे
गुरुवर चरणि शरण मज द्यावे
वा तव स्मरणि मरण मज यावे

वा वा वा....शब्द स्वर सारेच उत्तम....जिते रहो....गाते रहो...

मूळ नाटकाची तोडफोड केली, मूळ ढाचा बदलला...असं कोणीही कीतीही म्हणाले तरी या "कट्यार.." ची धार अज्जिबात कमी होत नाही. जुनं ते सोनं हे कीतीही खरं असलं तरी नवे बदल, जर ते चांगल्या हेतूने केले असतील तर आपलेसे करायला काय हरकत आहे. आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना ज्याना जुनं नाटक आता पाहाणं शक्य नाही त्यांच्या साठी सुबोध भावे नी दिलेली ही "कट्यार.." खरच अनमोल आहे.त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार.
जुन्या कट्यार च्या गीतांच्या तोडीस तोड नवीन सर्व गीते पुढील अनेकानेक वर्ष आमच्या मनात घर करुन राहातील हे निश्चित....
चित्रपट पाहुन बाहेर पडताना नक्कीच म्हणावसं वाटतं...
जिते रहो....!!! गाते रहो...!!!



No comments:

Post a Comment