माझ्या लहानपणी वरणफळे करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा...सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची...आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे..तर त्याची काय तयारी करायची..तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची....
त्याचं काय होतं..की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही..."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता..त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर.." ईति आमच्या मातोश्री..चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे ......मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात..त्यातलाच हा एक..) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाउन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण आपापल्या घरी जातंय...शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन..) चकोल्या चा प्रोग्रॅम ठरायचा...
वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो...हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची..अगं तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या...? हे ही खरंच होतं बरका....आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची...झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा....कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची...चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं..
आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणारर्या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.....
अजुनही आज्जीचा फोन आला की ती विचारते,कराड ला कधी येणार आहेस? एकदा चकोल्यांचा बेत करुयात...माझा मन लगेच माग पोचतं.चकोल्या पार्ट्यांसोबतच इतरही अनेक आठवणी मनात फेर धरुन नाचु लागतात....आणि मग मी लगेच चकोल्या करायचा "बेत" करते..आज्ज्जी नं शिकवल्यात तश्शाच
तर अशा या माझ्या आज्जी फेम चकोल्या....
१.कणीक भिजवताना त्यात मीठ,तिखट,हळद,आणि थोडे गुळाचे पाणी घालवे.तेलाचा हात लावुन कणीक भिजवावी.
आमटीची कॄती:
१. १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,४-५ काळी मिरी,२ लवंगा,१ तमालपत्र,थोडी दालचिनी,४ चमचे ओलं खोबरं,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं
२.मग थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात वरील वाटण नीट परतून घ्यावे.त्यात २ वाट्या शिजवलेली तूरडाळ घालावी.भरपूर पाणी घालावे ( वरणफळांना पोहता आले पाहिजे).गुळ,चिंच,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालावा...व उकळी येउ द्यावी...
आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन (पीठी लावु नये नाहीतर चाकोल्या फारच गिजगोळा होतात) पोळी लाटावी...आणि कातण्याने मोठया शंकरपाळ्या कापुन उकळणार्या आमटीत सोडाव्यात...मस्त शिजु द्याव्यात ..आणि गरमगरम वरपाव्यात
टीपः या चित्रात जरी चकोल्या बाऊलमद्धे दिसत असल्या आणि शेजारी चमचा वगैरे दिसत असला तरी हे प्रकरण चमच्याने वगैरे खाण्याची चुक अजिबात करु नये...पाप लागेल ...हे सगळं मस्तपैकी ताटात ओतायचं,ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं ( त्यासाठी मी त्या चमच्याचा वापर केला ) आणि हातने भुरकायचं....मग कोपरपर्यंत ओघळ आला तरी चालेल
No comments:
Post a Comment