Thursday, May 28, 2015

सुखी माणसाचा सदरा

"ताई जरा एक काम होतं."
"आज मला ३०० रु द्याल का उसने ? पुढच्या महिन्याच्या पगारात कापुन घ्या" कामवाल्या मावशी मला म्हणाल्या....

"काय झालं मावशी ? काही प्रॉब्लेम आहे का ? घरी सगळं ठीक ना ?"
मी असं म्हणताच हसुन म्हणाल्या की " आज मुलीचा वाढदिवस आहे.बरेच दिवसांपासुन मागे मागली आहे की मैत्रिणींना घरी बोलव आणि माझा पण वाढदिवस केक कापुन करायचा.ती पण ३-४ मैत्रिणींकडे जाउन आली वाढदिवसाला तेव्हापासुन डोक्यात हे खुळ घेतलय.आता आम्हाला कसं काय परवडायचं हो ताई पण पोरीचा हट्ट पण नाही ना मोडवत."

मला माझ्या लेकीचा धुमधडाक्यात केलेला वाढदिवस आठवला.शेवटी मुलं ती मुलंच. त्याना काय कळणार आर्थिक ओढाताण वगैरे.मी त्याना ४०० रु दिले.पण मग मलाच चिंता पडली की ४०० रु मद्धे त्या काय काय करणार.

" मावशी काय करायचं ठरवलयं." मी
" ताई तुम्हीच सुचवा ना काहितरी. मला तर काहिच सुचत नाहिये."

मी त्याना म्हटलं, मावशी तुम्ही मस्त भेळ बनवा आणि केक आणा. अय्यंगार बेकरीत छान बटर केक मिळतात तिथे चौकशी करा.भेळीच सामान कुठे मिळेल ? किती लागेल सगळं त्याना सांगितलं. चटणी कशी करायची ते पण नीट समजावलं.माझाकडे केसांना लावायचा एक नवीन आणलेला खडे असलेला रबर बँड होता तो त्यांच्या लेकीला माझ्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट म्हणुन दिला.घरी जाताना खुश होत्या.

पण तरी माझ्या मनात रुखरुख लागुन राहिली. मी दिलेले एवढेसे पैसे पुरतील का त्याना ? अजुन थोडे द्यायला हवे होते.की चटणी तरी मीच करुन द्यायला हवी होती ? काल बोलल्या असत्या तर रात्री करुन ठेवुन आज दिली असती.पण आता आयत्यावेळी मला सुचलच नाही काही आणि वेळही नव्हता.असो.दिवसभर कामाच्या गडबडीत मी विसरुन पण गेले हे सगळं.दुसर्या दिवशी सकाळी मावशी आल्या.एकदम खुश होत्या.

" काय मावशी पुरले का पैसे " झालं का सगळं व्यवस्थित ?"
" ताई खुप मस्त केला मी पोरीचा वाढदिवस. तिच्या सगळ्या मैत्रिणीं खुश झाल्या. बर झालं तुम्ही भेळेचं सांगितलं मला. १५० रु चा केक आणला "गणराज" मधुन. १०० रु चे चुरमुरे आणि फरसाण आणले.५० रु चे कांदे, टमाटे कोथिंबीर हे सगळं आणंलं.तरी १०० रु उरले म्हणुन मग पोरीसाठी नवीन बांगड्या माळ आणि कानातलं आणलं. पोरगी फार फार खुश झाली बघा.
मला म्हणाली माझ्या सगळ्या मैत्रिणींपेक्षा मोठा झाला माझा वाढदिवस."

खुप भरभरुन बोलत होत्या मावशी. मला खुप बरं वाटलं.
"चला पोरगी खुश तर आपण खुश अजुन काय पाहिजे" मी.


मनात विचार करत राहिले मी. नकळत माझी आणि त्यांची तुलना सुरु झाली मनात.
माझ्या लेकीच्या हौसेपायी १०००० रु खर्चुन हॉल घेउन मी तिचा वाढदिवस साजरा केला होता. ६०-७० लोक, मोठा बार्बीचा केक, डेकोरेशन, १००-२०० फुगे. नवीन कपडे, रीटर्न गिफ्ट्स, काय नी काय....मला समाधान मिळालं नाही असं नाही. पण तरी जेवढा पैसा मी खर्च केला तो एखाद्या गरीबाला किती उपयोगी पडला असता.

आणि फक्त ४०० रुपयात मावशींनी किती मनापासुन लेकीचा आनंद साजरा केला. ईतक्या कमी पैशात उद्या मी असच समाधानाने वाढदिवस करु शकेन का ? पैसा वाढला तशा अनावश्यक गरजा पण वाढल्या हेही तितकच खरं आहे. आत्ता मी हा सगळा विचार करते आहे पण उद्या माझ्या लेकीचा पुढचा वाढदिवस आला की मी नवीन उत्साहानं परत नवीन प्लॅनिंग करेन कदाचित."कळतय पण वळत नाही" अशी आमच्या सध्याच्या पिढीची अवस्था आहे. माणसाकडे जितका पैसा वाढतो तितका तो असमाधानी बनत जातो का?

मागे अशाच एका आशयाची गोष्ट व्हॉट्स अ‍ॅप वर वाचनात आली होती. एका आज्जीबाईंनी ५०० रु. उसने घेउन त्यात सगळा खर्च बसवुन लेक, नात सगळ्यांची हौस भागवली होती. लेखकाने त्या लेखात उल्लेख केला होता की आजकाल एक पिज्झा घेतला तरी ५०० रुपये जातात पण त्या आज्जीनी खर्च केलेल्या ५०० रु चं मोल पिज्झा पेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

माझ्या मावशीनी त्या ३०० रु च्या बदल्यात मला बरचं काही शिकवलं. हाताच्या बोटावर मोजण्याईतके कपडे त्यांच्याकडे असतील पण सर्वात महत्वाचा असा "सुखी माणसाचा सदरा" त्यांच्याकडे आहे.
मला कधी मिळेल ?

 

No comments:

Post a Comment