कॉलेज चे दिवस म्हणजे खरोखरच इतके सुंदर,अलवार..जणु रंगीबेरंगी नाजुक फुलपाखरुच...सगळ जगं खुप खुप सुंदर आहे असा विश्वास देणारे...शाळेपर्यंत आपल्याच कोषात मग्न असलेल्या माझ्यासारख्यांना तर अचानक बर्याच गोष्टींचा साक्षात्कार होतो....अचानक सगळं बदलून जातं..कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगावर कवीता वगैरे सुचु लागतात...अशीच फुलपंखी दिवसात केलेली ही कवीता...
चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे,
अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे......
दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा,
वार्यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा......
अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे...........
पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे...........
तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे,
वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे..........
मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,
इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच साथ असावी...
बी.जे. मेडीकल कॉलेज मद्धे दरवर्षी गणेशोत्सवात आंतरमहाविद्याययीन स्पर्धा चालु असायच्या...अशाच एका वर्षी बी.जे. च्या "वेदांत" मद्धे "काव्यवाचन" स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाले होते...पुण्यात ते सुद्धा आंतरमहाविद्याययीन स्पर्धेत सहभागी व्हायचा पहिलाच प्रसंग होता....तिथे ही कवीता सादर केली होती...आणि पाडगांवकरांची "चिउताई"... निकाल जाहीर होताना एकदम आरामात होते कारण आपल्याला काही बक्षिस मिळणार नाहीच हे गृहीत धरलं होतं...ईतक्या विविध कॉलेजेस मधुन सहभागी झालेल्या मुलांनी ईतक्या भारी भारी कविता सादर केल्या होत्या..की त्यापुढे माझी कविता म्हणजे उगीच आपलं..."र" ला "र" आणि "ट" ला "ट" जुळवलेलं आहे असं वाटलं होतं... आणि बक्षिस जाहीर झालं...उलट्या क्रमाने...
तृतीय क्रमांक : अमुक
द्वितीय क्रमांकः तमुक
आणि
प्रथम : चक्क त्यांनी माझं नाव पुकारलं......आणि मिनलने त्याचक्षणी घट्ट मिठी मारली मला....:-) इतकं मस्त वाटत होतं ना तेव्हा....आपण आपल्या कॉलेज साठी बक्षिस मिळवुन आणलं आहे याची जाणीव झाली एकदम..सोबतच्या सगळ्यांनी "एम्.आय्.टी." चा नुसता गजर केला होता आख्या सभागृहात... :-)
आणि नंतर लगेचच तिथे कँप मधेच "मार्जोरीन" ला पार्टी ...खिशात पैसे नसताना एका मित्राकडुन उधार घेउन केलेली ती पार्टी आठवुन आता हसायला येतं...खरतर आता ही कवीता वाचुनच फार हसायला येतं.....:-)ईतकी साधीसुधी कविता तर कोणीपण लिहु शकेल असं वाटतं आता :-)..
आज अचानक त्या ५-६ वर्षापुर्वीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आल्या....आणि "वेदांत" च्या सुद्धा...
पण कशीही असली तरी ही कविता मला अतिशय प्रिय आहे...कारण ती मला आठवण करुन देते...सायनाकर कडुन उधार घेउन दिलेल्या त्या "पार्टीची" आणि
बक्षिस जाहीर होताच मिनलने मारलेल्या त्या मिठीची ... ...
खरचं....Those were the Best Days of My Life...