Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, February 27, 2026

माय मराठी

 *मराठी भाषा गौरव दिन चिरायू होवो*


भाषा मराठी ही माझी 

अंश माय माऊलीचा 

नेई अनोख्या विश्वात 

हात धरून शब्दांचा 


कधी हळवी मधाळ 

कधी ठसका तिखट

कधी हापूसची गोडी 

कधी सह्याद्री राकट 


जरी बदलत जाई 

रूप कोसाकोसावरी 

सारे कौतुके पहाती

नाना तऱ्हा नाना परी 


अशी सहज समृद्ध 

काय सांगू अप्रूप 

मनातल्या भावनांना 

भाषा देई शब्दरूप 


भाषा आनंदाचा झरा 

संस्कृतीचा पंचप्राण 

भाषा मराठी ही माझी

मला तिचा अभिमान 


-©️स्मिता श्रीपाद 

27 फेब्रुवारी 2026

Wednesday, July 23, 2025

*अग्निशिखा*


 

*अग्निशिखा*

काळोख्या संध्याकाळी
अंधार पसरतो जेव्हा
उजळते दिशा या साऱ्या
मी होऊन पणती तेव्हा
हृदयाच्या खोल तळाशी
पसरतो तिमिर दुःखाचा
मी शांत तेवती समई
जणू किरण तुला आशेचा
दाटती मेघ अवकाशी
तम कवेत घेतो अवनी
नभ तेजाळून टाकाया
मी वीज चमकते गगनी
कधी असेन साधी ठिणगी
कधी ज्योत शांत तेवती
पण ठाऊक माझे मजला
मी अग्निशिखा तळपती
-©️स्मिता श्रीपाद
दीप अमावस्या 2025

आषाढी वारी


 

सावळा विठोबा, साजिरी रखुमाई |

बाप आणि आई, आले घरा ||
देखणे ते रूप, पाहुनिया डोळा |
प्रेमाचा उमाळा, दाटे मनी ||
सुंदर ते ध्यान, घेता डोईवर |
संसाराचा भार, उतरला ||
-©️स्मिता श्रीपाद
आषाढी वारी 2025

युद्ध

 अंगावरची ओली हळद वाळायच्या आधीच

नव्या नवरीला निरोप देउन एक जवान लढायला जातो..
तो सीमेवर तुमच्या आमच्यासाठी लढतो तेव्हा
त्याच्या सुरक्षेसाठी इथे लढत असतं कोणीतरी...नियतीशी
लेकाच्या कानशिलावर बोटं मोडुन
त्याला युद्धावर पाठवणारी म्हातारी आई,
मनावरचा अदृश्य दगड सांभाळत बघत बसते
"मदर्स डे" चे फोटो,रील्स आणि स्टेटस
आपल्या बाळासोबत फोटोत हसणारा जवान,
परत कधीही न येण्यासाठी निघुन जातो.
आपल्या आत कितीही काहीही हललं तरी
त्या दु:खाचं ओझं नाहीच पेलु शकणार आपण
समाजमाध्यमांवर तावातावाने एकमेकांशी "चर्चा करणारे"
राजकीय, शाब्दीक युद्ध खेळणारे
युद्धाचा इव्हेंट बनवून ब्रेकिंग न्यूज वगैरे बनवणारे
काही दिवस फक्त शांत बसुन
प्रार्थना का नाही करु शकत ? ..आपल्याच सैनिकांसाठी ?
युद्ध करणं ही आपली निवड नाही, नाईलाज आहे.
आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी उचललेलं पाउल आहे.
हे कधी आणि कसं समजावणार आपण
फटाके उडवुन "सेलिब्रेट" करणार्या ‘देशभक्त’ लोकांना ?
सात आठ वर्षांच्या निरागस लेकीचा
प्रेमळ निरोप घेउन सीमेवर गेलेला एक बाप,
आज तिरंग्यात लपेटुन परत आलाय...
लेकीच्या गालावर अखंड अश्रु होउन बरसतोय...
युद्ध कशाला ? म्हणुन आधी गळे काढणारे
आणि आता युद्ध का थांबवलं ? म्हणत परत गळे काढणारे
या सगळ्यांना त्या लेकीचं सांत्वन करता येईल ?
युद्ध म्हणजे काय ? ते तिला विचारुयात....
-©️स्मिता श्रीपाद
बुद्धपौर्णिमा 2025

आनंदाचे झाड


 

सुखदुःखाच्या चक्रामधुनी उलगडते जगण्याचे कोडे

पळता पळता पाऊल थकले ? वळणावरती थांबू थोडे
नवी पालवी जपता जपता पानगळीला अलगद झेलू
नात्यांमधले नाजूक गुंते साऱ्या गाठी हळूच उकलू
मुक्त मानाने अनुभवताना ऋतुचक्राचे येणे जाणे
सदा अंगणी बहरत राहो “आनंदाचे झाड" देखणे
-स्मिता श्रीपाद
19 एप्रिल 2025

कौसल्येचा राम


 

"कबीराचे विणतो शेले,कौसल्येचा राम बाई

भाबड्या या भक्तासाठी देव करी काम"
तो आलाय स्वतः..
तुमच्यासमोर बसलाय..
तुमच्या आयुष्याचा एक एक धागा विणतोय..
प्रत्येक श्वासाचा नवा धागा
प्रत्येक दिवसाचा नवा धागा..
"एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ...राजा घनश्याम"
तुम्ही डोळे मिटून त्याचा धावा करण्यात मग्न..
आणि तो.. ?
तुमच्या संचिताचे धागे जोडायच्या प्रयत्नात..
जे काही विणलं जातंय ते सुंदरच दिसावं
असा त्याचा प्रयत्न...
"विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम"
तुमच्या नकळत त्याने घेतलीये काळजी..
सुख, दुःख, राग, लोभ, प्रेम, द्वेष, आनंद, चिंता
असे सगळे धागे जोडून..
तुमच्या आयुष्याचा शेला विणलाय त्याने...
धागे कसेही असो..कोणतेही असो...
अंती दिसतंय ते फक्त "रामनाम" 🙏🏻
"हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ? कुठे म्हणे राम ? कुठे म्हणे राम ?"
डोळे उघडायला जरा उशीर झाला का ?
अखंड आयुष्याचा शेला सुरेख धाग्यात गुंफून
तो श्रीराम गेलाय कुठे ?
कुठे शोधू ? कसं शोधू ?
आणि मग अचानक लख्ख दिसला..
सावळी, सुंदर, तेजाळ, आश्वासक मूर्ती...
इथेच आहे तो... कायम सोबत..
तुमच्या आमच्या अंतरंगात...
श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🏻
-©️स्मिता श्रीपाद
रामनवमी 2025

 


हरवलेली(?) कविता

 *हरवलेली(?) कविता*

पुस्तकांचं कपाट आवरताना
जुनी वह्या-पुस्तके चाळता चाळता
गुलाबी वहीतून बाहेर डोकावली
अलगद जपून ठेवलेली कविता
कवितेलाच मग विचारलं
कुठे गायब असतेस गं अशी ?
बरेच दिवसात भेटली नाहीस
उंबराचं फुलच जशी
गेल्या आठवड्यात म्हणे
होता 'जागतिक कविता दिवस'
सापडली असतीस तेव्हा तर
लावले तरी असते फेसबुकला 'स्टेटस'
आताशा नवं काही सुचत नाही
कागद राहतो तसाच कोरा
दिवस रात्र आपले पळतायत
जिवाला उसंत नाही जरा
छंद, यमक, वृत्त, मात्रा
ठेवलंय सगळं गोळा करून
पण उमलण्याची ओढ मात्र
यावी लागते गं आतून
खुद्कन हसून कविता म्हणाली
हवी कशाला जुळवाजुळवी ?
थोडंस खत-पाणी घातलं की
रोपाला सुद्धा फुटते पालवी
छंद, यमक, मात्रा दिसल्या की
मी मुळी फिरकतच नाही
मराठीच्या व्याकरणाची
मला अजुनही भीती वाटते बाई
कधीतरी डोळे मिटून शांत बैस
आणि थोडं डोकावून बघ मनात
फक्त एक दीर्घ श्वास
एवढंच अंतर तुझ्या माझ्यात
-©️स्मिता श्रीपाद
होळी पौर्णिमा 2024


Tuesday, July 22, 2025

*महिला दिन.... गाळलेल्या जागा*

 *महिला दिन.... गाळलेल्या जागा*

स्त्री मुक्तीची गीतं
तिचा आत्मसन्मान
तिची अस्मिता ....
इत्यादी इत्यादी
घरकाम सणवार पै पाहुणे
मुलांच्या क्लास शाळा
घरीच तर असतेस दिवसभर....
इत्यादी इत्यादी
समसमान हक्क, निर्णयस्वातंत्र्य
महिलांचा आदर सन्मान
गुलाब पुष्पगुच्छ....
इत्यादी इत्यादी
चारचौघात मस्करी, चेष्टा
कायम सेकंड प्रायोरिटी
शेवटची पंगत बायकांची....
इत्यादी इत्यादी
फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम
शुभेच्छांचा पूर
जागतिक महिला दिन....
इत्यादी इत्यादी
ऑफिस मध्ये लेडी बॉस ? नको
प्रमोशन ? तिला नकोच
तिला काय कळतंय ?....
इत्यादी इत्यादी
ती दया क्षमा शांती
ती अन्नपूर्णा,लक्ष्मी, सरस्वती
ती दुर्गा काली रणचंडी ....
इत्यादी इत्यादी
ती सीता, द्रौपदी, निर्भया
ती मीरा, राधा, अनुसूया
ती गार्गी, मैत्रेयी, शकुंतला....
इत्यादी इत्यादी
'व्यक्ती' म्हणून आदर
भावनिक आणि शारीरिक सुरक्षितता
महिला दिन सुफळ संपूर्ण....
इत्यादी इत्यादी
©️स्मिता श्रीपाद
8 मार्च 2023

निळा तुकडा

 फेसबुक च्या जुन्या फोटो मधुन दिसणारा,

माझ्याच घराचा निळा तुकडा बघुन,
परत एकदा दिसायला लागलं,
सगळं लख्ख......तसंच्या तसं.......
जे जिथं सोडलंय,
ते अजुनही तिथेच आहे......
रात्री जागुन मारलेल्या गप्पा,
लटकी भांडणं आणि रुसवे फुगवे,
आरड्याओरड्याचे आवाज,
हास्यविनोदाचे फवारे,
खमंग थालिपीटाचे वास,
वाफाळलेला भात आणि गरम भाकरी
कपडे,खेळणी,पुस्तकांचा अद्रुश्य पसारा,
आईचा स्पर्श,
मनात खोल पुरुन ठेवलेल्या जखमा
आणि
चाफ्याचा वास.

आजी

 आजी

आजीच्या बटव्यात असतो
अनेक गोष्टींचा खजिना
डोळ्यांना दिसला नाही तरी
जाणवतो फक्त तिच्या नातवंडांना
तिच्या साडीचा मऊसूत पदर..
तिच्या भोवती फिरणारा वास..गोडसर
तिचा सायी सारखा स्निग्ध तळहात..
आणि तिची मिठी..घट्ट..उबदार
ताक घुसळताना होणारा नाद..
लोणी साखरेची इवलीशी वाटी..
स्वयंपाक घरातली गोड गुणगुण..
आणि देवघरातली फुलांची दाटी
रात्री कुशीत घेऊन मारलेल्या गप्पा,
परी, चिमणी आणि राजाची गोष्ट..
पत्ते, काचाकवड्या चा तासनतास खेळ,
आणि चेहेऱ्यावर हात फिरवून काढलेली दृष्ट
औक्षण करताना टाकलेल्या अक्षता
तिच्या डोळ्यात लुकलुकणारे दिवे
पाठीवर थाप मारत दिलेला आशीर्वाद
यशवंत ,औक्षवंत, सुखी व्हावे
वाळवण आणि उन्हाळ्याची सुट्टी,
भेळ, आंबे , पन्ह आणि कैरी
तिच्या हाताचा दैवी आमटी भात
पापड मसाल्याची बांधून दिलेली शिदोरी
पण मग... एक आजी जाते तेव्हा..
ती तिच्यासोबत घेऊन जाते का?
हा सगळा खजिना ?
मुळीच नाही..
ती खरंतर देऊन जाते तिच्यातल बरंचस काही
आपल्या ओटीत..खण नारळाच्या सोबतीने...
तिच्यातलं आज्जीपण
सापडतं मग आपल्याला हळूहळू...
कधी आमटीच्या खमंग फोडणीत,
कधी शांत तेवणाऱ्या निरंजनात
तर कधी ताकावर आलेल्या लोण्यात..
- स्मिता श्रीपाद
( आज जागतिक कविता दिन. हे खास माझ्या आजी साठी 🙏🙏 )

Saturday, October 1, 2022

गळाभेट

 दोन वर्षांनी वारी होतेय, देवाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूर कडे निघालाय.

दोन वर्षात खूप काही घडलंय. देवाला भेटायचंय, बरंच काही सांगायचंय, मन शांत करायचंय अशी सगळ्याच माऊलींची मनस्थिती असेल. तिकडे मंदिरात देवाची अवस्था काही वेगळी नसणार.

मंदिरात विठुरायाची अस्वस्थ लगबग रखुमाई बघतेय.माऊलींचा जयघोष करत आज सगळ्या दिंड्या, पालख्या पंढरपूर च्या वेशी ला पोचल्यात.

विठ्ठल आणि रखुमाई मध्ये काय संवाद होत असेल याक्षणी ? 

आज सकाळी माउलींनी हे लिहून घेतलं.

ते त्यांच्या चरणी अर्पण 🙏


पुंडलीक वरदा हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


"काय हो विठुराया

गालातल्या गालात हसताय !

काय चाललंय मनात तुमच्या

आज मोठे खुशीत दिसताय !"


सगळं माहीत असूनही

रखुमाई देवाला म्हणाली,

स्वारीची जरा मजा करू

मनातल्या मनात हसली


काय सांगू रखुमाई तुला

आजचा दिवस आहे खास,

दोन वर्षांनी सुटणार आहे

आज माझ्या लेकरांचा उपवास 


वेशीवर आलेत म्हणे

दिंड्या आणि पालख्या घेऊन,

त्यांचं स्वागत कर बरका

गूळ आणि शेंगा देऊन


दोन वर्षे झाली गं

बाप लेकरांची भेट नाही,

मधली पोकळी भरून काढेन 

देतो बघ तुला ग्वाही


एवढ्या मोठ्या संकटा समोर

उभी राहिली धीराने

दमली असतील मंडळी आता,

शरीराने आणि मनाने


कोरोना राक्षसामुळे

घर दार कोलमडले,

डोळ्यामध्ये पाणी देऊन

सगे सोयरे सोडून गेले


संकटांवर मात करत

नव्या वाटा शोधत आहेत,

माझ्यावर भरोसा ठेवून

पुन्हा उभी राहत आहेत


एकदा गळाभेट झाली की

दिसू लागेल पुढची वाट,

नव्याने लढण्यासाठी

बळ येईल मनगटात


मी कधीचा आवरून बसलोय

तू पण तयार हो पटकन

दमून आलीत लेकरं माझी

त्यांचं करायचंय ना माहेरपण


मंदिराचा कळस बघून

कसे धावत सुटलेत थेट

मला तर असं झालंय

कधी एकदा होईल गळाभेट

कधी एकदा होईल गळाभेट


- स्मिता श्रीपाद

आषाढी एकादशी, 2022


#चैतन्यवारी #विठ्ठलविठ्ठल

Monday, March 12, 2012

आईपण

आज खुप दिवसांनी..बहुदा वर्षभरानंतर काहीतरी लिहावसं वाटतय...पण काय लिहु मी...? कशी सुरुवात करु परत ?....गेले काही दिवस रोज ब्लॉग उघडते काहीतरी लिहिण्यासाठी... आणी तसाच बंद करते....पण आज ठरवलय मी..चार-दोन ओळी लिहिल्याशिवाय अज्जिबात झोपायचं नाहिये आज....

काहीच विषय का सुचत नाहिये आज याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या....की गेले एक-दीड वर्ष मी अशा एका गोंडस आणी गोड विषयात अडकले आहे की त्यापुढे बाकी सगळं सगळं गौण आहे माझ्यासाठी...."आईपण" असं असतं का ?
येताजाता कधीही भेटलं तरी आपल्या मुलांबद्दल बोलणार्‍या बायकांना मी एकेकाळी हसायचे...."मुलांशिवाय काहीच कसे विषय नसतात यांच्याकडे बोलायला? " असं वाटायचं मला...."मी नाही बाई अशी टिप्पीकल बायकांसारखी वागणार..." असं मनात ठरवायचे..किंवा स्वतःच्या मनाला अशी ताकीद द्यायचे...पण..आजकाल मी सुद्धा मैत्रिणीना भेटले की...."आमची पिल्लु ना सध्या काही खातच नाही गं..दाढा येतायत ना...." किंवा...."छकुली ना आजकाल खुप खुप दंगेखोर झालिये गं...फार लक्ष द्यावं लागतं...""हगीज पेक्षा ना तु पॅम्पर्स वापरुन बघ...तो जास्त छान आहे....ईत्यादी ईत्यादी...." ...

तर तात्पर्य काय की सगळ्या बायका आया झाल्या की त्यांचं असंच होत असावं....आणि ते स्वाभाविकच आहे....माझंच बघा ना...परत ब्लॉग लिहायला सुरुवात करताना सुद्धा काय लिहु काय लिहु करत करत मी परत लेकीकडेच वळले...असो...

आज रंगपंचमी...आज माझ्या आईचा वाढदिवस असतो....आणि ज्या माझ्या आईमुळे मलासुद्धा हे गोड नातं अनुभवायला मिळालं तिला शुभेच्छा देउन आजची पोस्ट थांबवते....

प्रिय आई,

मी तुला कोणत्या शब्दात सांगु,
माझ्या अयुष्यातलं तुझं स्थान....?
तुच माझ्या प्रत्येक कृतीमागची कल्पना..
तुच माझ्या जीवनाची प्रेरणा...
माझ्या गळ्यातला सुर तू...
माझ्या ओठातले गीत तू...
माझ्या पाठीवरची कौतुकाची थाप तू...
माझ्या चुकांना खडसावुन जाब तू...
तुझ्यामुळेच माझं अस्तित्वं...
नी तुझ्यामुळेच मला स्वत्वं...
सगळ्यांपेक्षा खुप खुप वेगळी तू...
आणि माझ्या गालावरची खळी सुद्धा तूच...

आज तुझ्या वाढदिवशी,
देवाजवळ एकच मागणं....
मला तुझा आशीर्वादाचा हात सतत हवा आहे...
तू माझ्यासाठी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी....

तुला खुप खुप शुभेच्छा...
तु सतत आनंदी राहावीस म्हणुन....!!!

Monday, August 31, 2009

स्वप्नं

कॉलेज चे दिवस म्हणजे खरोखरच इतके सुंदर,अलवार..जणु रंगीबेरंगी नाजुक फुलपाखरुच...सगळ जगं खुप खुप सुंदर आहे असा विश्वास देणारे...शाळेपर्यंत आपल्याच कोषात मग्न असलेल्या माझ्यासारख्यांना तर अचानक बर्‍याच गोष्टींचा साक्षात्कार होतो....अचानक सगळं बदलून जातं..कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगावर कवीता वगैरे सुचु लागतात...अशीच फुलपंखी दिवसात केलेली ही कवीता...

चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे,

अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे......

दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा,

वार्‍यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा......

अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,

तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे...........

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,

स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे...........

तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे,

वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे..........

मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,

इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच साथ असावी...

बी.जे. मेडीकल कॉलेज मद्धे दरवर्षी गणेशोत्सवात आंतरमहाविद्याययीन स्पर्धा चालु असायच्या...अशाच एका वर्षी बी.जे. च्या "वेदांत" मद्धे "काव्यवाचन" स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाले होते...पुण्यात ते सुद्धा आंतरमहाविद्याययीन स्पर्धेत सहभागी व्हायचा पहिलाच प्रसंग होता....तिथे ही कवीता सादर केली होती...आणि पाडगांवकरांची "चिउताई"... निकाल जाहीर होताना एकदम आरामात होते कारण आपल्याला काही बक्षिस मिळणार नाहीच हे गृहीत धरलं होतं...ईतक्या विविध कॉलेजेस मधुन सहभागी झालेल्या मुलांनी ईतक्या भारी भारी कविता सादर केल्या होत्या..की त्यापुढे माझी कविता म्हणजे उगीच आपलं..."र" ला "र" आणि "ट" ला "ट" जुळवलेलं आहे असं वाटलं होतं... आणि बक्षिस जाहीर झालं...उलट्या क्रमाने...
तृतीय क्रमांक : अमुक
द्वितीय क्रमांकः तमुक
आणि
प्रथम : चक्क त्यांनी माझं नाव पुकारलं......आणि मिनलने त्याचक्षणी घट्ट मिठी मारली मला....:-) इतकं मस्त वाटत होतं ना तेव्हा....आपण आपल्या कॉलेज साठी बक्षिस मिळवुन आणलं आहे याची जाणीव झाली एकदम..सोबतच्या सगळ्यांनी "एम्.आय्.टी." चा नुसता गजर केला होता आख्या सभागृहात... :-)

आणि नंतर लगेचच तिथे कँप मधेच "मार्जोरीन" ला पार्टी ...खिशात पैसे नसताना एका मित्राकडुन उधार घेउन केलेली ती पार्टी आठवुन आता हसायला येतं...खरतर आता ही कवीता वाचुनच फार हसायला येतं.....:-)ईतकी साधीसुधी कविता तर कोणीपण लिहु शकेल असं वाटतं आता :-)..

आज अचानक त्या ५-६ वर्षापुर्वीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आल्या....आणि "वेदांत" च्या सुद्धा...
पण कशीही असली तरी ही कविता मला अतिशय प्रिय आहे...कारण ती मला आठवण करुन देते...सायनाकर कडुन उधार घेउन दिलेल्या त्या "पार्टीची" आणि
बक्षिस जाहीर होताच मिनलने मारलेल्या त्या मिठीची ... ...
खरचं....Those were the Best Days of My Life...