Tuesday, July 22, 2025

वरणफळं पार्टी

 वरणफळं पार्टी

माझ्या लहानपणी वरणफळं करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा.
सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची.आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे तर त्याची काय तयारी करायची ? तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची.
त्याचं काय होतं की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता.त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर." ईति आमच्या मातोश्री.
चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे.मुळात आईला डाळ, आमटी हे प्रकार फारसे करायला पण आवडायचे नाहीत. कोरडी पालेभाजी किंवा फळभाजी आणि एखादी ओलसर उसळ किंवा सार्/कढी/गोळ्याचं सार्/चाकवत असा आमच्याकडे रोजचा स्वयंपाक असायचा. आम्ही दोघी बहिणी आमटी प्रेमी असलो तरीही अगदी आठवड्यातुन एक दिवस आमटी असायची. वरणफळं वगैरे लांबची गोष्ट.
मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात.त्यातलाच हा एक) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाऊन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण घरी परत जातंय.त्यामुळे शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन.) चकोल्या/वरणफळं चा प्रोग्रॅम ठरायचा.
वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची, जाउदेत ग.तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या? हे ही खरंच होतं बरं का.आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची. (मामा पुरता वेगळा स्वयंपाक व्हायचा. तो पण आईच्याच लाईन मधे.चकोल्या न आवडणारा..बिचारा )
झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा.कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची.चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणार्या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.
दरवेळी आजीचं चकुल्याचं ( चकुल्या..आजीचा शब्द ) पातेलं बघितलं की आजोबा म्हणायचे," विजु इतकं सगळं कोणं ग संपवणार?" त्यावर आजी म्हणायची "तुम्ही काळजी करु नका.आम्ही बघतो कसं संपवायचं ते" आणि मग जेवताना पातेलं संपत आलं की मिस्कील हसुन म्हणायचे,
"संपलं की ग.मला काळजीच पडली होती"😂
एकदा मी आणि माझी मैत्रिण 'अभ्यासाला' म्हणुन आजीकडे गेलो होतो. आजीच्या घरातली वरची मामाची खोली किंवा गच्ची दुपारी मोकळीच असायची. तिथे छान अभ्यास व्हायचा. आम्ही येणार म्हणुन आजीनं वरणफळं केली. गेल्या गेल्या थोडाफार अभ्यास केला आणि मग गरमागरम वरणफळांवर आडवा हात मारला. त्यावर आणि ताजं ताक पिलं. आता १५-२० मिनिटं डुलकी काढतो आणि मग अभ्यासाला बसतो असं ठरवुन वरच्या खोलीत गेलो. आणि काय चमत्कार.. १५ मिनिटांचे २ तास झाले अपोआप 😉. अशा त्या आजीच्या जादुई चकुल्या.
आजी कडुन ज्या अनेक रेसिपी शिकले त्यातली ही अगदी जिव्हाळ्याची. थोडक्यात कृती पण लिहुन ठेवते इथेच.
चकुल्यांसाठी कणीक भिजवताना त्यात मीठ,हळद आणि थोडं गुळाचे पाणी घालायचं आणि तेलाचा हात लावुन कणीक भिजवायची.
गुळाचं पाणी घालुन कणीक भिजवल्यामुळे चकोल्यांना स्वत: ची अशी एक सुरेख गोडुस चव येते.
आमटीसाठी १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,१-२ काळी मिरी,१ तुकडा दालचिनी,१-२ चमचे ओलं खोबरं,जिरे,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं.मग थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात हे वाटण नीट परतून घ्यायचं.त्यात शिजवलेली तूरडाळ घालायची.भरपूर पाणी घालायचं ( वरणफळांना पोहता आलं पाहिजे).गुळ,चिंच कोळ,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालायचा आणि मस्त खळखळुन उकळी येउ द्यायची.
आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन पोळी लाटायची.पीठी अजिबात लावायची नाही नाहीतर सगळी पिठी आमटीत उतरते आणि चकोल्या फारच गिजगोळा होतात.त्यामुळे तेलावरच लाटायची पोळी. मग छोट्या नैवेद्याच्या वाटीने गोल गोल फळं करुन घ्यायची.बरेचजण कातण्याने मोठ्या शंकरपाळ्या कापतात पण आजी कायम गोल आकारात फळं करुन घ्यायची. चव बदलते म्हणायची. काय कोण जाणे खरच चव बदलते का एकदा प्रयोग करुन पाहिला पाहिजे.ही गोल गोल फळं उकळणार्या आमटीत टाकायची आणि मस्त शिजु द्यायची.व्यवस्थित शिजली की गॅस बंद करुन हे सगळं प्रकरण थोडावेळ मुरु द्यायचं.
जेवताना या चकोल्या मस्तपैकी ताटात वाढुन घ्यायच्या. वर मनसोक्त तुप घालायचं.ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं आणि हाताने भुरकायचं.मग कोपरापर्यंत ओघळ आला तरी चालेल.
आम्हा बहिणींचं हे वरणफळं/चकोल्या प्रेम आमच्या लेकींपर्यंत पोचलंय.त्यामुळे आमच्या चकोल्या पार्ट्या होत असतात नेहेमीच.धोधो कोसळणार्या पावसात किंवा मस्त गुलाबी थंडीत अशा गरमागरम वाफाळत्या चकोल्या करायच्या आणि आजीची आठवण काढत खायच्या. तिकडे वरती बसुन आमच्याकडे बघुन ती पण तृप्तीचा ढेकर नक्की देत असणार.
तळटीप:- बहिणाबाईंचं approval न घेता हा लेख गडबडीत पोस्ट केला आणि त्यातली सगळ्यात मोठी चूक मॅडम नि शोधून काढली😜.
"आपल्या दुसऱ्या आजीच्या चकोल्यांचा उल्लेख पण करायला हवा होतास" असे कान उपटले गेले आहेत. दुसऱ्या आजीबद्दल लिहिण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यामुळे तिथल्या चकोल्या पार्टी चा उल्लेख नवीन लेखात करेन आता😀 Shweta Kulkarni Kanade दुसऱ्या आजीवर लेख लिहायला घेतला आहे ग 🤗🤗.प्रूफ रीडिंग ला पाठवते.
-©️स्मिता श्रीपाद

पितळी बंबाच्या पाण्याची दिवाळी

 पितळी बंबाच्या पाण्याची दिवाळी

नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी बटाणे गल्लीतल्या देशपांडे वाड्याच्या दगडी पायर्यांवर मी आणि आमचे दादा ( बाबांचे वडील) गप्पा मारत बसलेलो असायचो.
कराडच्या प्रसिद्ध मनोऱ्याजवळ असलेल्या देशपांडे वाड्यात माझे आजी आजोबा म्हणजे वडिलांचे आई बाबा राहायचे.जुन्या पद्धतीचा भव्य असा सुंदर असा वाडा होता तो. मध्यभागी बाग, त्यात बकुळीचं खूप जुनं झाड होतं.त्याचा कायम सडा पडलेला असायचा.बकुळीचं फुल कधीही उचललं कि त्यातून एखादी तरी मुंगी तुरुतुरु बाहेर पळायची.गोड वासाच्या या फुलात कायम मुंग्या असणारच.आजी आजोबा या वाड्यात राहायचे आणि जवळच एका अपार्टमेंट मध्ये आमचं घर होतं.शनिवार रविवार किंवा मोठ्या सुट्टया लागल्या कि माझा मुक्काम दोन्ही पैकी एका आजी आजोबांकडे ठरलेला असायचा.
दिवाळीच्या थंडीत वाड्याच्या पायऱ्यांवर कुडकुडत आजोबांशी गप्पा मारत बसायला फार मजा यायची. नुकतच चावडी चौकातुन फेरफटका मारुन उटणं, तेल, मोती साबण अशी खरेदी झालेली असायची. आजोबा मला सात शेपटीच्या उंदराची गोष्ट सांगायचे. कितीही वेळा ऐकली तरी ती गोष्ट परत परत ऐकायला मला फार आवडायचं. कारण तो उंदीर 'नुतन मराठी शाळेत' (माझी प्राथमिक शाळा ) जाउन खेर बाईंच्या खुर्ची खालुन फिरुन यायचा, आजी बरोबर पिच्चर(हाच शब्द बरोबर आहे ) बघायला रॉयल टॉकिज मधे जायचा आणि घाटावर जाउन रॉयल च्या गाड्यावर पावभाजी पण खायचा.( आमच्या कराड मधे सगळा "रॉयल कारभार" असतो). थोडक्यात काय तर मला आवडणार्या सगळ्या गोष्टी तो उंदीर करायचा.मित्रं चिडवतात म्हणुन त्या उंदराची आई रोज रात्री त्याची एक-एक शेपटी कापायची आणि शेवटी चुकुन उरलेली एक शेपटी पण कापुन टाकायची. तरी बिचारा उंदीर हसत असायचा. गोष्टीचा शेवट आठवत नाही कारण तोवर आजी जेवायला हाक मारायची.
गरम-गरम म्हणजे तव्यावरची थेट ताटात अशी भाकरी खाउन झाली की आजी चं सुरु व्हायचं. झोपा आता, पहाटे सुनील काका येइल बघ.मग उठायला लागेल लवकर वगैरे वगैरे.उद्या पहाटे उठायचं या उचक्याने आज्जी रात्रभर बहुतेक जागीच असायची. शेजारी तिची सततची वळवळ मला पण अधुन मधुन जाणवायची.
इकडे पुण्यात सुनील काका कंपनी मधली त्याची रात्रपाळी संपली की गाडीत बसायचा आणि पहाटे ४-४:३० ला वाड्यात पोचायचा. वाड्याला भलामोठा लाकडी दरवाजा होता. आणि त्याच्या आतल्या बाजुला दोन्ही कडे दोन आरामात बसता येतील असे दगडी कट्टे होते. राजु काका आणि अन्नी काकाने सतत तिथे बसुन बसुन ते कट्टे झिजवलेत असं आमची आजी म्हणायची.सुनील काका आला की आजी ला हाक मारायचा, पहिला दारात आणि दुसरा आत वाड्यात येउन हौदाजवळ असे दोन लक्ष्मी तोटे
लावायचा आणि आमची दिवाळी सुरु व्हायची.
सुनील काका आला की उठा उठा करुन ओरडायचा पण आजी, झोपुदेत रे अजुन जरावेळ पोरींना करुन त्याला दामटायची. एवढा दंगा चालु असताना कसली काय झोप. श्वेता लगेच उठुन बसायची त्याला कारण सुनील काका. तो न चुकता तिला दिवाळीला सुंदर ड्रेस आणायचा आणि मला कधीच आणायचा नाही. मला आपलं कायतरी पर्स बाहुली अशी वस्तु असायची. याला आपलं माप इतकं कसं कळत नाही असं मला नेहेमी वाटायचं. मी आईकडे पण भुणभुण करायची की, तिलाच नेहेमी आणतो हा फ्रॉक आणि मला नाही. त्यामागे काय लॉजिक होतं ते मला कधीच कळलं नाही. मग एके वर्षी माझ्या भुणभुणीला घाबरून त्याने दोन ड्रेस आणले एक मला आणि एक श्वेतु ला. आणि ते दोन्ही पण तिच्याच मापाचे निघाले तेव्हा मग मी विषय सोडून दिला. दरवर्षी दिवाळीला माझ्या पेक्षा तिला एक ड्रेस जास्त मिळायचं दुःख त्या वर्षी दुप्पट झालं. पण मग पुढे मुग्धा काकु - राजु काका चं लग्न झाल्यावर काकु मात्र मला आवर्जुन फ्रॉक आणायची. तिला माझं माप बरोब्बर कळायचं.
सगळे उठले की आजी गॅसवर चहा चढवायची आणि आजोबा बंब पेटवायला घ्यायचे. एकदम देखणा, घाटदार पितळी बंब होता तो.स्वयंपाकघराच्या कोपर्यात छोटसं बाथरुम, त्यातला काळाभोर धुणी धुण्याचा दगड आणि तो बंब असं चित्र अजुनही दिसतं मला. आदल्या दिवशी घासल्यामुळे तो एकदम चकाकत असायचा. गार पाणी भरण्यासाठी त्याला वरच्या बाजुला झाकण असलेली खिडकी होती. आणि गरम पाणी सोडायला खाली नळ,बंब चांगला तापला की सगळ्या बाथरुम मधे धूर भरायचा. चहा पिऊन झाला की आजी तेल लावायला घ्यायची. तिच्या समोर बसवुन जोरजोरात चोळुन ती मनसोक्त तेल लावायची. आणि मोरीत ( आजीचा शब्द) नेऊन त्या दगडावर बसवायची. बंबाचं पाणी ईतकं गरम असायचं की बटाटे शिजतील. आधीच त्या बाथरुन मधे भरलेला धूर, कढत खरपूस वासाचं पाणी , त्यात आणि शिवाय 'पाठीला लावते गं,किती काळवंडलीय' असं म्हणुन खसाखसा उटणं चोळणं असं एकदम साग्रसंगीत अभ्यंगस्नान घडायचं. त्या सगळ्या वातावरणात मला गुंगी च यायला लागायची.मग छान नवीन कपडे करुन पहिले काम म्हणजे देवदर्शन. कोटातल्या गणपतीला पहिला नमस्कार ( खरतर याला पंतांचा गोट असं नाव आहे पण माझ्या लहानपणापासुन आम्ही कोट असंच म्हणतो . असो ) आणि मग घाटावर आमच्या ग्रामदेवता कृष्णाबाई चे दर्शन.घाटावर म्हणजे आमच्या कराड मध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा सुंदर संगम आहे आणि तिथे कृष्णा नदीवर सुंदर दगडी घाट बांधला आहे. त्या घाटाच्या पायऱ्यांवर बसून नदीकडे बघत बसायला फार मजा येते. भल्या सकाळी नदीवर मस्त धुकं असायचं.ते बघायला मजा यायची.समस्त कराडकर मंडळी नवीन कपडे घालुन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तिथेच भेटायचे.
मग घरी येउन आजी आजोबा काका काकु आई बाबा सगळ्यांसोबत फराळ विथ कांदेपोहे चहा. आणि मग पुढचं काही आठवत नाही 😉
त्यानंतर थेट मी 6वी-7वी मधे असतानाची दिवाळी आठवते. आमच्या सरस्वती अपार्टमेंट उर्फ वाटेगावकर बिल्डींग मधली.
शाळेच्या परीक्षा संपल्या कि सगळे मित्र मौत्रिणी मिळून बिल्डिंग च्या सगळ्यात खालच्या मजल्यावर किल्ला करायचे.त्यासाठी कुठून कुठून दगड, विटा, जुनी पोती, माती असं सगळं गोळा करायचो आम्ही.म्हणजे मोठी मुलं त्यात पुढाकार घ्यायची. आम्ही पोरी आणि लहान मुलं जमेल तसा हातभार लावायचो.सगळे कपडे मातीमय करून घरी येऊन आई चा खोटा खोटा ओरडा खायचा.एके वर्षी मी आणि श्वेतु ने आमचा दोघींचा स्वतंत्र छोटुसा किल्ला आमच्या गॅलरी मध्ये केला होता.माझ्या दृष्टीने तो त्या वर्षीचा सर्वात देखणा किल्ला होता.सगळ्या मित्रमंडळींना घरी बोलावून आवर्जून तो किल्ला दाखवून कौतुक करून घेतलं होतं.
त्यावेळची अजून एक मोट्ठी आठवण म्हणजे फटाके.
मी नवीन नवीन फटाके उडवायला शिकले होते तेव्हा. मला लहानपणापासुन फटाके अजिबात आवडायचे नाहीत. लक्ष्मीपुजना दिवशी तर कानावर दोन्ही हात ठेवुन माझ्या कित्येक दिवाळ्या गेल्या.माझ्या दोन्ही काकांना आणि बाबांना फटाके उडवणे फार प्रिय. मी तर लहानपणी भितीने रडायचे पण म्हणे. दर दिवाळीत आजोबा कसे तीनही भावांना आणि आत्या ला फटाके समसमान वाटुन द्यायचे, मग सुनील काका कसा स्वतः चे सगळे फटाके संपवुन मग आत्याचे फटाके ढापायचा, मग ती कशी रडायची आणि मग आजोबा कसे त्याला ओरडायचे ही गोष्ट पण ऐकायला लागायची.
तर मी काय सांगत होते...
हा.. तर मी 6वी-7वी मधे नवीन नवीन फटाके उडवायला शिकले होते. ते पण लवंगी फटाका. आई बाबांसोबत गावाबाहेर कुठेतरी खरेदी विक्री संघात जाऊन खास फटाके आणायचो आम्ही.पहाटे उठुन आई बाबांच्या आधी आवरुन आम्ही सगळी पोरं गच्ची वर फटाके उडवायला पळायचो. बिल्डींग मधले माझे सगळे मित्र मैत्रिणी फटाके उडवण्यात सराईत होते. मी आपली गच्ची च्या कठड्यावर एक एक लवंगी फटाका ठेवुन उदबत्तीने लावु का नको करत कशीबशी लावायचे. त्यात आणि उजाडलं की ती मेली वाट पेटली आहे की नाही ते पण दिसायचं नाही. डोळ्यांना चांगलाच व्यायाम व्हायचा. काही शूर(आगाऊ) पोरं हातात लवंगी पेटवून हवेत उडवायचे. एके वर्षी अशाच एका शूर पोराने उडवलेली लवंगी माझ्या केसात पडली होती आणि केस फरफर जळायला लागले. सुदैवाने ती विझवली लगेच. जळक्या केसांचा फार घाण वास येतो असं एक नवीन ज्ञान त्या दिवशी मिळालं आणि फटाके हा आपला प्रांत नाही हे मान्य करुन मी कायमची त्यावर फुली मारली. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी फक्त आणि फक्त फुलबाज्या उडवते. नागगोळी नावाचा एक दिव्य वासाचा फटाक्याचा प्रकार पण लहानपणी मिळायचा.घरोघरीच्या चकलीच्या आणि तळणीच्या वासामुळे डोकं चढलं की त्यावर उपाय म्हणुन फटाके उत्पादकांनी तो काढला असावा. त्याच्या भयंकर वासात जगातले कुठलेच वास येऊ शकणार नाहीत.
आजकाल हा प्रकार लुप्त झालाय. आमच्यावेळी असं नव्हतं 😂हा हा हा
पुढे मग वाडा सोडुन आजी आजोबा आमच्या घराच्या अगदी जवळ रहायला आले आणि मला पण नंतर सात शेपटीच्या उंदराच्या गोष्टीची गंमत वाटेनाशी झाली म्हणुन मग आदल्या दिवशी आजीकडे जाउन रहायची परंपरा थांबली. पण सकाळचे देवदर्शन आणि एकत्र फराळ चालु राहिला. पुढे माझ्या चुलत बहिणींचा आणि आत्ये भावंडांचा जन्म झाला तसे फराळाचे मेंबर वाढत गेले. फटाक्याच्या आवाजासाठीचे माझ्या कानावरचे हात आता लहानग्या तनु च्या कानावर जाउन बसले 😀
मग मी पुण्यात शिकायला आले तोवर राजुकाका-काकु कराड ला शिफ्ट झाले होते.मग पहिला फराळ पुढचे काही वर्ष काकु च्या घरी सुरु झाला ते पार माझ्या लग्नापर्यंत.
माझं लग्नं झाल्यावर पहिल्या एक-दोन दिवाळ्या पुण्यात साजर्या झाल्या आणि कराड च्या दिवाळीत खंड पडला. पण मग परत कराड च्या माझ्या सासरच्या घरात दिवाळी ची परंपरा चालु झाली. लग्नानंतर कराड ला पहिल्यांदा दिवाळी होती तेव्हा पहिली अंघोळ झाल्यावर मी घरच्या सगळ्यांना म्हणलं की चला आता घाटावर जाऊयात. तेव्हाचे त्यांचे चेहेरे मला अजुन आठवतात. मला सकाळी ७ ला कशाला जायचंय घाटावर असं प्रश्णचिन्ह दिसलं मला. मग कळलं की सगळेच कराड्कर दिवाळी दिवशी उठुन घाटावर जात नाहीत. नदीच्या पलिकडचे तर नाहीच. आम्ही नदीच्या अलिकडचे च जातो. एक छोटासा सांस्कृतिक धक्का बसला. मग नवरा आणि दीर म्हणाले, संध्याकाळी जाऊ हं घाटावर तुझी पावभाजी खायला. आता मस्त कांदेपोहे खाऊन गप्पा टाकु. कराडच्या आमच्या घराजवळच माझ्या मामा-मावशांची ( दीर-नणंदांची - माझं लग्न नात्यातलं आहे त्यामुळे माझ्या सगळ्या मामा मावशा माझ्या सासर्यांची भाचवंडं आहेत ) घरं आहेत आणि पहिला फराळ आम्ही सगळे १५-२० जण एकत्र करतो. मग दर दिवाळीला एकत्र पहिला फराळ आणि मग पार जेवणापर्यंत गप्पा आणि मग मस्त दुपारची झोप असं गेली अनेक वर्षे चालु आहे.
दिवाळी म्हणजे कराड हे डोक्यात इतकं बसलंय की मला पुण्यातल्या दिवाळीची फारशी कल्पनाच करता येत नाही. अधे मध्ये काही कारणाने काही काही दिवाळ्या पुण्यात झाल्या पण पुण्याच्या दिवाळीला कराड सारखा वास आणि चव येत नाही हे नक्की.आता माझ्या लेकीला पण दिवाळीला कराडलाच जायचं असतं. कराड मध्ये जाण्यासाठी 'अंगण असलेलं जमिनीवरचं घर' हा तिचा मुख्य निकष आहे.
लहानपणीचा पितळी बंब कधीच गायब झाला.मग आधी गॅसवर तपेलीत तापलेलं पाणी, मग गॅस गिझर ते मग ईलेक्ट्रीक गिझर च्या पाण्यावर आमच्या पहिल्या अंघोळी पोचल्या.प्रत्येक बदलासोबत काही जुनं सुटत गेलं पण त्याचबरोबर काहीतरी नवं सुंदर भेटत गेलं.त्यामुळे उगीच त्यावेळीच भारी होतं वगैरे मला म्हणायचं नाहिये. पण आजकाल कसं जुन्या गोष्टींना अचानक फार महत्व आलंय. जसं की कल्हई लावलेली भांडी, मातीची भांडी, बिडाचे तवे, लोखंडी कढया पार अमेझॉन वर मिळतात. चुलीवरचा स्वयंपाक करून वाढणारी हॉटेलं जिकडे तिकडे दिसतात. चुलीवर कढवलेलं तुप यापासुन ते पार चुलीवर आटवलेल्या दुधाचं आईस्क्रीम असं काय वाट्टेल ते मिळतं. तसंच जर का कुठे
"खास दिवाळी निमित्त आमच्या येथे पितळी बंबात तापवलेल्या पाण्याची पहिली अंघोळ करायला मिळेल" अशी जाहिरात दिसली तर मला नक्की सांगा.😊
🪔तुम्हा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.🪔
-©️स्मिता श्रीपाद
दिवाळी 2022

आठवणींचा भोंडला ..... to be continued

 आठवणींचा भोंडला ..... to be continued

😊
गेल्या आठवड्यात "आठवणींचा भोंडला" लिहिताना मनोमन फेर धरला होता, त्यावेळी अजिबात कल्पना केली नव्हती की या लेखामुळे पुढच्याच आठवड्यात खरोखरीचा फेर धरायला मिळेल.
नवरात्रीत भोंडल्या बद्दल माझ्या लहानपणीच्या आठवणी असा एक लेख लिहिला होता तो वाचून घरच्या व्हाट्सअप ग्रुप वर आणि माझ्या फेसबुक पेज वर खूप मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे कौतुकाचे मेसेज आले. पण ही सगळी मंडळी मला ओळखणारी, माझ्या आठवणींचा भाग असलेली आणि त्या लेखातील संदर्भ माहीत असलेली होती. माझ्या आठवणी मला अजिबात न ओळखणाऱ्या लोकांना वाचायला आवडतील का ? अशी मनात शंका होती त्यामुळे जरा साशंक मनाने तोच लेख मी आमच्या (लेकीच्या) शाळेच्या 'प्रबोधिनी पालक लेखन गटावर' पाठवला.पण तिथे सुद्धा त्या लेखाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला.
तो लेख वाचून सर्वांना आपापले लहानपणीचे दिवस आठवले.
आपण सुद्धा भोंडला करूयात अशी कल्पना पुढे आली आणि आसावरी ताई आणि रेवती ने लगेच ही कल्पना उचलुन धरली. लगेच त्याच दिवशी " भोंडला नियोजन गट" तयार झाला सुद्धा.पाचवी ते दहावी मधील आम्ही प्रत्येकी 1-2 प्रतिनिधी या गटात सहभागी झाले. सर्वात मोठे काम होते ते म्हणजे तारीख,वेळ आणि जागा ठरवणे. आमच्या शाळेच्या सहामाही परीक्षा शनिवार 8 ऑक्टोबर पासून सुरू होत होत्या त्यामुळे मुलांचे वेळापत्रक बिघडू न देता तारीख आणि वेळ ठरवायला लागणार होती. म्हणून मग सर्वानुमते शनिवार 8 तारीख संध्याकाळी ५ ते ७ असे ठरले.
पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागा. शाळेत भोंडला करता येईल का ते अजून माहिती नव्हतं पण भोंडला करायचाच हे नक्की होतं. त्यामुळे काही उत्साही सदस्यांनी आपापल्या घराच्या आजूबाजूचे हॉल वगैरे बघायची सुद्धा तयारी दाखवली. शाळेत जागा शोधण्यासाठी आणि परवानगी घेण्यासाठी दुहिता ताई आणि प्रत्युमा ताई ने पुढाकार घेतला आणि गच्ची किंवा वरचे उपासना मंदीर मिळु शकेल हे नक्की केले. आता भोंडल्याचे निमंत्रण सर्व पालक गटांवर पाठवण्यात आले. नोंदणी साठी साधारण दोन दिवस दिले होते.माता पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता ६०-७० जणी तयार झाल्या.
हा आमचा पहिलाच अनुभव असल्यामुळे आम्हाला येणाऱ्यांचा नक्की आकडा कळणे अत्यंत गरजेचे होते कारण त्यावर पुढील सर्व नियोजन अवलंबून होते. त्यामुळे नोंदणी ची मुदत कटाक्षाने पाळावी लावली.
एकदा येणाऱ्यांची संख्या कळल्यावर पुढील चर्चा सुरू झाली. नियोजन गटाने झूम मीटिंग घेऊन पुढचे सगळे मुद्दे ठरवले. इतका मोठा आकडा बघून खरंतर आम्ही काही जणी घाबरलो होतो आणि सरळ सरसकट वर्गणी जमा करून एकत्र खिरापत आणू असं आम्ही म्हणायला लागलो. पण आसावरी ताई आणि सुखदा ने समजावलं की आपण सर्वांना खिरापत ठरवायची संधी देऊ आणि त्यामुळे ओळखायची गम्मत पण येईल. आणि आज खरच खिरापत ओळखायला खूप मजा आली. त्या त्या ग्रुप ला खिरापत ठरवायला पण तेवढीच मजा आली असणार हे नक्की. त्याबद्दल सुखदा आणि आसावरी ताई ला खूप धन्यवाद.
इयत्तांनुसार गट करून गोड की तिखट एवढा चॉईस आम्ही त्या त्या गटांना दिला आणि खिरापतीचा निर्णय त्यांच्यावर सोडून दिला. प्रत्येक गटाला एक एक रंग पण वाटून दिला म्हणजे कलर कोड मुळे अजून मज्जा येईल. हत्ती कोणी काढायचा किंवा आणायचा, फुलं कोणी आणायची असं सगळं ठरलं आणि आम्ही ८ तारखेची वाट बघायला लागलो.
उपासना मंदिरासाठी प्रत्युमा ताईने अर्ज देउन ठेवला होता पण तिथे आधीच कोणाचा तरी कार्यक्रम असण्याची शक्यता होती. आणि तो रद्द होउ शकतो हे पण आम्हाला कळले होते. तिथे जागा नाही मिळाली तर गच्ची होतीच पण पावसाच्या शक्यतेमुळे उपासना मंदिर मिळालं तर बरं असं वाटत होतं सगळ्यांना.त्यामुळे प्रत्युमा ताई ला सगळे जण सारखं, "मिळतंय का ग उपासना मंदीर ? काही कळलं का त्यांच्या कार्यक्रमाचं ? झाला का रद्द ?" असं विचारत होतो. शेवटी ती म्हणाली की "सारखं सारखं त्यांना कसं विचारु मी की तुमचा कार्यक्रम रद्द झाला का म्हणुन ? कसंतरीच वाटतय .. हा हा हा" पण शेवटी एकदाचा त्यांचा कार्यक्रम ६ नंतर आहे त्यामुळे तोवर आम्हाला मिळेल जागा हे नक्की झालं. उपासना मंदिरात भोंडला झाला की गच्ची मधे जाऊ खिरापत खायला आणि पाउस आला तर एखाद्या वर्गात जाऊ असं ठरलं.
इकडे भोंडल्याच्या ६० जणींच्या गटावर नुसती गम्मत चालु होती. आपल्याला येत असलेली गाणी सगळ्याजणी सुचवत होत्या.गप्पागोष्टी सुरु झाल्या होत्या.साडी की ड्रेस असे प्रश्ण एकमेकींना विचारले जात होते. भोंडला झाला की फुगड्या पण खेळुयात का ? असे कोणीतरी सुचवले.
दोन तास नक्की पुरतील ना ? असा आसावरी ताई ला प्रश्ण पडला 🙂 मनात म्हणलं या पोरी आता मंगळागौरीचे खेळ पण खेळायचा प्रस्ताव द्यायच्या आत विषय बदलुयात.. हा हा हा... एकंदर सगळ्यांचा उत्साह बघुन मजा वाटत होती. पण त्याचवेळी मला आणि आसावरी ताई ला एकदम pre-event anxiety आली होती. उपासना मंदीर खरच मोकळं असेल ना ? नसेल तर गच्ची वर गेलं पाहिजे, कालसारखा धो धो पाउस तर नाही ना येणार. सगळ्या जणी येतील ना ? खिरापत नीट पुरेल ना ? आम्ही एकमेकींना होइल ग सगळं नीट असं दर ४-५ वाक्यांनंतर म्हणत होतो. शेवटी ३:३० वाजले तसं आता आवरायला पळा आणि वेळेत शाळेत पोचा असे निरोप ग्रुप वर दिले.
ठीक ४:४५ ला शाळेत पोचले तेव्हा सगळ्याजणी यायला सुरुवात झाली होती.रंगांनुसार इयत्ता कुठाल्या ते ओळखता येत होतं. "तु पाचवी ची का ? मी आठवी ची". असे संवाद वय वर्षे ३५-४५ च्या बायकांमद्धे घडत होते. ठीक ५ वाजता फेर धरुन आधी सगळ्यांनी ओळखी करुन घेतल्या. आणि आमचा भोंडला सुरु झाला. नुसता फेर न धरता, टाळ्या, झिम्मा सगळे प्रकार करत येतात नाहीत ती सगळी गाणी मनसोक्त गायली. कारल्याचा वेल, वेड्याचं गाणं, बिघडलेली जिलबी याशिवाय काही माहिती नसलेली अनवट गाणी सुद्धा म्हटली. शेवटी फिरुन फिरुन पाय दुखायला लागले. तेव्हा आड बाई आडोणी होउन आमचा भोंडला संपवला.
मग महत्वाचा कार्यक्रम म्हणजे फोटोसेशन पार पडले आणि सगळ्या जणी गच्ची मधे गेलो. इयत्तांनुसार खिरापत ओळखायचा खेळ चांगलाच रंगला. मग दमुन भागुन गेलेल्या सगळ्यानी मस्तपैकी ढोकळा, कचोरी, मटार करंजी, काजुकतली, बालुशाही, कॉर्न पॅटीस वर ताव मारला. तिकडे उरलेले फोटोसेशन पार पडले आणि हळुहळु एकमेकींचा निरोप घेउन सगळ्या निघालो.
जाताना काही जणी मला धन्यवाद म्हणत होत्या, का तर म्हणे मी लेख लिहिल्यामुळे भोंडल्याची मजा घेता आली. पण त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की खरतर मलाच त्यांना धन्यवाद म्हणायचे आहेत. खूप खूप मनापासुन धन्यवाद. भोंडला हा माझ्या मनातला अतिशय हळवा कोपरा आहे कारण त्याच्या सोबत माझ्या स्वर्गीय आईच्या आठवणी जोडलेल्या आहेत.तुम्हा सगळ्यांमुळे मला आज अनेक वर्षांनी मनासारखा अगदी लहानपणी सारखा भोंडला खेळायला मिळाला. मी पाटावर हत्ती काढुन नेलेला आणि त्यासोबतच माझ्या आईने काही वर्षांपुर्वी मला भेट दिलेली गजांतलक्ष्मी देखील आवर्जुन आणली होती.आठवणींचं एक वर्तुळ पूर्ण झालं.
या भोंडल्यामुळे खूप छान छान मैत्रिणी भेटल्या, नियोजन करतानाचे सुंदर अनुभव दिले आणि कायम स्मरणात राहातील अशा सुंदर नवीन आठवणी तयार करुन दिल्या.आपापल्या आयांनी दिलेला हा गजगौरीचा वसा आपण सगळ्या जणी अशा पद्धतीने पुढे नेऊ शकलो यातच आनंद आहे.
- ©️स्मिता श्रीपाद
8 ऑक्टोबर 2022




***आठवणींचा भोंडला***

 ***आठवणींचा भोंडला***

"मधुजा आज डबा अर्धाच का खाल्लास ?"
"वेळ मिळाला नाही. भोंडल्याचं बोलत होतो.आमच्या वर्गाला गोड खिरापत करायला सांगितली आहे.१० वी च्या ताया आलेल्या त्या सुचना देत होत्या."
"अगं पण उपाशी राहुन कसली चर्चा ?"
"..आणि आमच्या शाळेत ना दरवर्षी एकमेकांची खिरापत फोडायची आणि स्वत: ची लपवायची अशी मजा असते.भांडाभांडी पण होते. "
लेकीची बडबड संपतच नव्हती. भोंडला , खिरापत शब्द ऐकल्यावर मला पण उत्साह संचारला.
"तुला येतात का गाणी ? "
"हो येतात की. आपण करतो की कधीकधी वर टेरेस वर भोंडला तेव्हा ऐकली आहेत मी"
त्यादिवसापासुन मनात भोंडला सुरु झाला. सगळ्या आठवणी फेर धरुन नाचायला लागल्या. आता लिहिल्याशिवाय पर्याय नाही मला ☺️
"सरस्वती अपार्ट्मेंट्स, कराड"
वर्ष साधारण - १९९३-१९९४
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासुन शेवटच्या दिवसापर्यंत न चुकता बिल्डींग मधल्या तमाम मैत्रिणींच्या घरामधे आम्ही भोंडला करायला जायचो. पाटाच्या मागच्या बाजुला किंवा दगडी पाटीवर हत्ती काढायचा तो शेवटच्या दिवसापर्यंत तसाच ठेवायचा. हॉल च्या मध्यभागी हत्ती, त्याला एखादं फुल, आणि आज किती गाणी म्हणायची त्याच्या खुणा/रेषा ओढुन ठेवायच्या. एक गाणं झालं की रेष पुसायची.
पहिल्या दिवशी १ च गाणं.त्यात ऐलमा पैलमा बाय डीफॉल्ट + १ + खिरापतीचं गाणं अशी ३ गाणी पहिल्या दिवशी आणि नवव्या दिवशी ऐलमा पैलमा + ९ + खिरापतींचं गाणं असं असायचं.
एक घर झालं की दुसरं.संध्याकाळी ७ ते ९ हेच. खिरापती हेच जेवण व्हायचं.
ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा खेळ मांडु दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडला वेशीच्या दारी,
पारवळ घुमतय बुरुजावरी
....
...
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दुधोंडे
दुधोंड्यची वाजली टाळी,
आयुष्य दे रे वनमाळी
माळी गेला शेताभाता,
पाउस पडला येताजाता
पड पड पावसा थेंबोथेंबी,
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
पिवळ्या लोंबी आणुया,
तांदुळ त्याचे कांडुया
मोदक-लाडु बनवुया,
श्रीगणराया अर्पुया.
अधल्या मधल्या ओळी विसरलेल्या असायच्या त्या ९ व्या दिवसापर्यंत पक्क्या व्हायच्या.
गणरायाला पहिला नमस्कार घातला की लगेच यायचे लिंबु.
"एक लिंबु झेलु बाई दोन लिंबु झेलु
.....
....
सोनारदादा सोनारदादा,
बाळाच्या बिंदल्या झाल्या की नाही
आज नाही उद्या या"
या गाण्याची आणि माझी एक गंमत आहे. मी नेहेमी "बाळाच्या पाटल्या झाल्या का नाही" असं म्हणायचे आणि भोंडला म्हणायच्या उत्साहात बाकी जणी काय म्हणत आहेत याकडे कधी लक्षच दिलं नाही मी.बिंदल्या हा शब्द कळूनसुद्धा त्याचा अर्थ च माहिती नसल्यामुळे बाकी सगळे काहीतरी चुकीचं म्हणत आहेत. पाटल्याच शब्द बरोबर आहे पण बाळाला कोण पाटल्या करत असेल ? असेल बुवा कोणीतरी तालेवार , किंवा पूर्वीच्या काळी करत असतील अशी मी माझ्या मनाची समजुत करुन ठेवली होती आणी रेटुन चुकीच म्हणत असायचे.
पुढे अनेक वर्षानी, मधुजा झाली तेव्हा तिच्या बारशाच्या वेळेला आजी म्हणाली की मी बाळाला बिंदल्या करुन आणल्यात बघ. बिंदल्या म्हणजे काय बघु ग म्हणुन पाहिलं तेव्हा एकदम क्लिक झालं की अरेच्चा " बाळाच्या बिंदल्या झाल्या का नाही" त्यातल्या बिंदल्या म्हणजे हे का ? बराच वेळ एकटीच हसत बसले होते तेव्हा.
असो. बरचं विषयांतर झालं. आता परत भोंडल्या कडे येउ.
तर लिंबु झेलुन झाले की यायचे शिवबा.
शिवाजी आमुचा राजा,
त्याचा तो तोरण किल्ला
तोरण किल्ल्यात सात विहिरी,
सात विहिरीत सात कमळे
एक एक कमळ तोडीले,
भवानी मातेला अर्पिले
भवानी माता प्रसन्न झाली,
शिवरायांना तलवार दिली
तलवार घेउनी आला,
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे,
हादग्यापुढे गाणे गावे.
इथवर आलं की पुढे काय ते सुचायचं नाही पटकन. एक क्षण शांतता. ईतक्यात एकजण
"श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेड माझ्या नशीबी आलं"
चं दळण सुरु करायची आणि माझी भयानक चिडचिड व्हायची. हे गाणं मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. अजुनही. उगीच ती वेड्याची बायको काय काय करायची आणी वेडा सगळी वाट लावायचा.त्यात आणि शेवटी वेडा त्याच्या बायकोला झोपलेली असताना मेली असं समजुन जाळुन टाकायचा. काय च्या काय. ईतक्या मस्त देवाच्या भोंड्ल्यात हे कसलं डीप्रेसिंग गाणं ग बाई.
कसं तरी रेटुन हे गाणं संपलं की माझं आवडतं गाणं मी सुरु करायचे.
अक्कणमाती चिक्कणमाती,
खळगा तो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई,
जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई,
सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई,
करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई,
तबकी ठेवाव्या
अस्सं तबकं सुरेख बाई,
शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई,
पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई,
माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई,
खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई,
कोंडुनी मारीतं
सुंदर चित्रदर्शी वर्णन... भक्कम दगडी जातं, सुरेख मुरड घातलेल्या करंजा, सुंदर चांदीचं तबकं, त्यावर रेशमी जांभळा किंवा लाल शेला, नक्षीदार कनाती, लोड गाद्या असलेली पालखी.... असं सगळं चित्रं दिसायलाच लागायचं मला लहानपणी... माझं अतिशय आवडतं गाणं..
अस्सं माहेर सुरेख बाई...असं आता म्हणताना डोळे ओले होतात आणि आईची आठवण येते.. पण सासर द्वाड नाहिये आणि सासुबाई आईची माया लावतात.🤗
अजुन एक गमतीचं पण मला न आवडणारं गाणं म्हणजे झिप्र्या कुत्र्याचं...
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं, परडी एवढं फूल गं, दारी मूळ कोण गं
दारी मूळ सासरा
सास-याने काय आणलंय गं
सास-याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई
तर मूळ म्हणजे पूर्वी लेकीला परत सासरी न्यायला जो माणुस यायचा त्याला मूळ आलंय असं म्हणायचे. तर या बाईला न्यायला सासरे, सासु, दीर, जाउ कोण कोण येतात ते पण भारी पैकी दागिने वगैरे घेउन तर जात नाही ते नाहीच आणि वर त्यांच्या अंगावर कुत्रं सोडते म्हणे आणि मग नवरा आला की गप चालायला लागते.
बहुतेक सासरच्यांवर वैतागलेल्या एखाद्या सासुरवाशीणीने लिहिले असेल
या सगळ्या गाण्यांशिवाय अजुन अनेक गाणी मला अजुनही सगळीच्या सगळी पाठ आहेत.
श्रावणी सोमवार आला, चला जाउ रामेश्वराला...
हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली....
कारल्याचा वेल लाव ग सुने, मग जा आपल्या माहेरा..
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून..
नणंदा भावजया दोघी जणी...
इथे लिहित बसले तर लेख ४-५ पानी होइल.त्यामुळे आता बास.
तर गाणी गाउन झाली की मुख्य मुद्दा. खिरापत.
आड बाई आडवणी,
आडाचं पाणी काढवणी
म्हणत एकदाचं.. आमचा भोंडला संपला असं म्हणायचं
आणि मग
दारी अंब्याची कोय ग,
खिरापतीला काय ग ?
घरात काय वास येत आहेत त्याचा अंदाज घ्यायचा. गोड आहे की तिखट विचारायचं आणि मग गेसिंग गेम ऑन.
"श्रीबालाजीचीसासु" पासुन सुरुवात करायची.
सगळ्या काकु कोणत्या पदार्थात पारंगत आहेत हे माहिती असायचं त्यामुळे त्यांचा हातखंडा पदार्थ बरेचदा असायचा. कधी लाडु, वड्या असा कोरडा खाउ, चिवडा, भडंग हे पण असायचे. कधी पेरु, सफरचंद अशी चिरलेली फळं, दडपे पोहे , उपमा, थालिपीठ, तिखट मिठाच्या पुऱ्या, घाऱ्या असे अनेक पदार्थ.
एकदा एका काकूंनी केलेली खिरापत ओळखताच येईना. येत असलेले नसलेले सगळे पदार्थ सांगून झाले. अपेक्षा फारच वाढल्या आमच्या आणि शेवटी सगळ्या हरलो तेव्हा चिमुकल्या डब्यात तुटीफ्रूटी घेऊन आल्या त्या आणि सगळ्यांच्या हातावर 4-4 तुकडे ठेवले.. सगळ्यांची तोंडं पडली होती. हा हा हा. अजून आठवलं की हसायला येतं. पण नंतर त्यांनी कशी गंमत केली असं म्हणुन सुंदर वडी हातावर ठेवली होती.
आमची एक मोठी ताई होती तिनं एकदा शेवटच्या दिवशी सगळ्यांना शेवटी बोलावून पोटभर मुगाची चवदार खिचडी आणि टोमॅटो सार खाऊ घातलं होतं.
भिजलेली हरबरा डाळ घालून साबुदाणा खिचडी असा एक डेंजर प्रकार 'वेगळी' खिरापत म्हणून खायला घातला होता कोणीतरी.😜
भोंडला म्हणजे मेमरी गेम, चित्रकला, गायन कला आणि पाककला या सगळ्यांचं प्रात्यक्षिक असायचं असं म्हणायला हरकत नाही.
दसरा संपला की कोजागिरी ला परत एकदा सगळे टेरेस वर जमायचो आणि आजच्या भाषेत पॉटलक असायचं. तेव्हा बाकी घरोघरीचे बाबा आणि दादालोक पण असायचे जेवायला.
मधुजा च्या भोंडल्या मुळे या सगळ्या आठवणी आल्या आणि परवा मला अचानक भोंडल्याचं एक गाणं आठवलं.माझ्या आईंच एक अतिशय आवडतं गाणं जे आमच्या बिल्डींग मधे फक्त तिलाचं यायचं आणि सगळ्या जणी शेवटच्या दिवशी आग्रहाने तिला म्हणायला लावायच्या.
"गाऊ गजगौरीचं गाणं, घालु रिंगण"
कौरव पांडव यांचा संदर्भ असलेलें हे गाणं.. त्यात कुंती आणि गांधारी ला गजगौरीचं व्रत करण्यासाठी आणि नंतर वाण देण्यासाठी हत्ती हवा असतो.तर पांडव थेट स्वर्गात जाउन ईंद्राचा ऐरावत आणतात त्यांच्या आईसाठी असं वर्णन आहे.
गुगल वर शोधलं तर कुठे सापडेना. मग माझ्या आईच्या सगळ्या माम्या, मावशा आणी माझ्या मावशांना कामाला लावलं. काल रात्री ११ वाजता सासुबाईंना हे गाणं आठवलं आणि सकाळी त्यांनी मला लिहुन आणि रेकॉर्ड करुन पाठवलं. पण तरी ते अपुरं होतं. मग जेवढं आठवतय तेव्हढं आज मी मायबोली.कॉम वर पोस्ट केलं आणि तिथे कोणाला माहिती असेल तर पूर्ण करायला सांगितलं. तिथल्या एकीला एका ब्लॉग वर हे संपूर्ण गाणं सापडलं. हेच ते माझ्या आईचं आणि माझं पण लाडकं गाणं.
गाऊ गजगौरीच गाणं, घालू रिंगण
गाऊ गजगौरीच गाणं, घालू रिंगण
कौरव भाऊ सर्व मिळोनी
करिती हत्ती माती आणोनि
गांधारीला वरी बसवोनी
वाटीयली वाणे...1
कुंतीला ते दिधले वाण
दुर्योधन बोले टोचून
तुम्हास आहे नशिबी कोठून
असले या जगती....2
माता कुंती कष्टी जाहली
भीम पुसे मग येऊन जवळी
शोक कशाचा चिंता कसली
सांग सांग आई.....3
सांगे वाणाचा वृत्तांत
भीम कोपला मग चित्तात
अणितो हत्ती म्हणे क्षणात
आला नदीतीरी...4
चिखल करी मग खळे खणोनी
फेकी भराभर गोळे करुनी
गेल्या वेशी सर्व बुजोनी
घडला आकांत...5
अर्जुन बोले मग भीमाला
खटाटोप हा उगीचकशाला
मागु ऐरावत इंद्राला
वाटाया वाणे.....6
बाणांचा मग जिना रचिला
भीम वरी स्वर्गात निघाला
इंद्राला वृत्तांत कळाला
झाला दुश्चित......7
इंद्र म्हणे हे अरिष्ट आले
म्हणोनी कपट इंद्राने केले
दारच स्वर्गाचे लावीयले
आवळोनी घट्ट ....8
भीमे केला गदाप्रहार
स्वर्गाचे मोडियले द्वार
आला इंद्राजवळी वीर
बोले इंद्राला....9
भीमसेन बोले इंद्राला
गजगौरीचे व्रत आईला
ऐरावत पाहिजे आम्हाला
वाटाया वाणे.....10
इंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती
द्यावा कैसा भूमीवरती
नेणे तरी तो कवण्या रीती
नेऊ जरी म्हटले.....11
त्यातच आहे मत्त जाहला
धजे न कोणी धरावयाला
मग तो येईल कसा तुम्हाला
न्यायाला खाली....12
आधीच चिडविला होता हत्ती
धावून आला भीमावरती
गदा प्रहारे जीरवी मस्ती
भीमसेन तेव्हा......13
हत्ती पळतो ची ची करोनी
भीम ओढीतो सोंड धरोनी
मुटकूळ त्याचे मग बांधोनी
टाकीयले पाठी.......14
आला ऐरावत घेऊनी
सजवी अंबारी घालोनी
कुंतीला मग वर बसवोनी
वाटीयली वाणे......15
धन्य धन्य ती कुंतीमाता
स्वर्ग आणिला भूवरीआता
गजगौरीचे व्रत आचरीता
लाभे जगी कीर्ती.....16
नवरात्र आणि भोंडल्याच्या या सगळ्या आठवणींसोबत आईच्या, लहानपणीच्या मैत्रिणींच्या, कराड च्या आठवणी हात धरुन आल्या. त्या सगळ्या सुंदर दिवसांसाठी परमेश्वराचे खूप खूप आभार. आता मागे बघताना असं वाटतंय की आपलं सगळं आयुष्य म्हणजे एकमेकांच्या हातात हात धरुन खेळलेला भोंडलाच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, प्रार्थना अशी सगळी गाणी आपण गात जातो. फक्त एक लक्षात ठेवायचं.सोबत असलेल्यांचा हात घट्ट घरुन ठेवला की रिंगणातुन बाहेर जायची भिती नाही.
हा आठवणींचा भोंडला माझ्या लाडक्या आईसाठी आणि आता आईच्या पश्चात माझ्यावर आईसारखंच प्रेम करणाऱ्या माझ्या सासुबाईंसाठी.
- ©स्मिता श्रीपाद
नवरात्र 2022

प्रभाकर आजोबां

 कुठल्यातरी घरगुती कार्यक्रमातला आदला किंवा दुसरा दिवस, रात्रीची वेळ, सगळीकडे किरर अंधार, पांघरूण अंगावर घट्ट ओढून आणि गरज पडली तर एकमेकांचे हात धरून आम्ही सगळे जण जिवाचे कान करून ऐकत असायचो. मतकरींची "जेवणावळ" कथा रंगात आलेली असायची. Climax चं वाक्य इतक्या जोशात यायचं की आम्ही किंकाळ्या फोडायचो. इतक्यात कुणीतरी एकदम लाईट चालू करायचे आणि किंकाळ्या चं रूपांतर हसण्यात व्हायचं..

**प्रभाकर आजोबांची** ही गोष्टीची मैफल आणि हे चित्र माझ्या मनात पक्के कोरले गेले आहे.
लहानांसोबत लहान आणि मोठ्यात मोठं होण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते. प्रभाकर आजोबा त्यातलेच एक.अगदी दोन वर्षांच्या बाळापासून ते अगदी घरातल्या सर्वात जेष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांशी ते अतिशय सहजपणे संवाद साधू शकत होते.
प्रभाकर आजोबा म्हणजे माझ्या आईचे मधले मामा. लहानपणी आई आणि सगळ्या मावश्या मामांकडून गप्पांमध्ये प्रभाकर आजोबांचे खूप किस्से ऐकले. आजोबा कसे सायकलवर सगळ्या पोरांना बसवून नदीतून पलीकडे न्यायचे, सगळ्या भाच्यांच्या वेण्या घालायचे, लहानपणी शेंगा फोडायची कशी स्पर्धा लावायचे या गोष्टी खूप वेळा ऐकल्या आहेत आम्ही.
माझे बाबा त्यांच्या लग्नाच्या वेळचा एक गमतीशीर किस्सा अजून सांगतात. आई आणि बाबांचं लग्न ठरलं तेव्हा बाबा बँक ऑफ इंडिया, फलटण येथे कॅशिअर होते.बाबांना बघायला आमच्या तात्या आजोबांसोबत प्रभाकर आजोबा पण गेले होते.मुलगा बँकेत आहे तो नक्की कॅशिअर आहे का शिपाई हे पडताळून पहायला.हा हा हा.....बाबा कॅश काउंटर ला दिसले तेव्हा खात्री पटली आणि मग लग्न लागले. अजूनही हे सांगताना बाबा मनापासून हसत असतात.
प्रभाकर आजोबा म्हणजे माझ्या सासर्यांचे मोठे भाऊ आणि माझ्या आईचे दोन नंबरचे मामा. माझं लग्न नात्यातलं असल्यामुळे नात्यांची सगळी मस्तपैकी भेळ आहे.
माझ्या आईच्या लग्नाच्या बैठकीत आईचे मामा म्हणून आणि पुढे माझं आणि श्रीपाद चं लग्न ठरलं तेव्हा आमच्या बैठकीत माझे मोठे चुलत सासरे म्हणून प्रभाकर आजोबा उपस्थित होते असा दुर्मिळ प्रसंग आम्ही अनुभवला.
आमच्या साखरपुड्यात फॅमिली ग्रुप फोटो चालू होता तेव्हा लांब कुठेतरी हॉल च्या टोकाला उभे असलेले प्रभाकर आजोबा पळत पळत आले आणि शम्मी कपूर स्टाईल झेप घेऊन सगळ्यांच्या पुढ्यात अक्षरशः आडवे झाले होते. तो त्यांच्या तसाच फोटो अजूनही माझ्याकडे आहे.
मला मामा आजोबा म्हणून आणि चुलत सासरे म्हणून त्यांचं प्रेम, कौतुक दोन्ही अनुभवायला मिळालं.
आमच्या कुटुंबातील सर्वात समतोल व्यक्तीमत्व.शांत डोक्याने आणि सर्व बाजूनी विचार करून एखाद्या प्रसंगात योग्य सल्ला देणारी व्यक्ती असे आमचे प्रभाकर आजोबा होते आणि त्यामुळेच आमच्या कालवडेकर कुटुंबात कोणाकडे ही काहीही कार्य असो किंवा काही बिकट प्रसंग, पहिली आठवण प्रभाकर आजोबांची आणि पहिली हाक त्यांना मारली जायची.
लहानपणी घरात होणाऱ्या लहान मोठया कार्यात आजोबा नेहेमी लीडर + स्वयंसेवक अशा दुहेरी भूमिकेत असायचे. सर्वांना कामं वाटून देणे आणि दुसऱ्या बाजूला खुर्चा सतरंजी उचलण्यापासून ते पंगतीत आग्रह करकरून लोकांना वाढण्यापर्यंत ते काहीही करू शकायचे.
एरव्ही शांत असणारे प्रभाकर अजोबा यावेळी एकदम जोशात असायचे आणि पोराटोरांबरोबर भरपुर दंगा पण करायचे.
मला आठवतं , एकदा श्रावणात भाउ आजोबांच्या "ओंकार" बंगल्यावर सत्यनारायण होता आणि पंगत बसली होती. पंगतीत शेवटचा भात वाढून झाला आणि एकमेकांना आग्रह सुरु झाले. तू घे मी घे करत आग्रह करण्यात आणि दंगा करण्यात भाऊ आजोबा आणि प्रभाकर आजोबा सगळ्यात पुढे. सुमारे 1.5 तास पहिलीच पंगत , हसण्याचा गडगडाट आणि दंगा चालू होता. शेवटी माझी विजू आजी पदर खोचून बाहेर आली आणि "प्रभाकर,भावड्या आवरा आता पुढचे लोक खोळंबलेत जेवायचे" असे म्हणून परिस्थितीवर ताबा मिळवला. पुढे बायकांची पंगत बसली तेव्हा सगळ्या बायकांच्या पानात भराभर वाढायला आणि वर सगळ्यांना आग्रह करायला पण हे सर्वात पुढे.
आम्ही भाग्यवान म्हणून आम्हाला अशा भरल्या घरातल्या देखण्या पंगती बघता आल्या आणि कायम मनावर कोरल्या गेल्यात.
कराड जवळ कालवड्याला आमचं विठ्ठल रखुमाईचं मन्दीर आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकी ला आम्ही सगळे आवर्जुन फराळाचे डबे घेउन तिथे जायचो. तिथे आमच्या पोरांबरोबर बाहेरच्या अंगणात, कबड्डी किंवा डाँकी-मंकी चे डाव खेळायला पण ते पुढे असायचे
कुठल्याही ट्रिप ला जाताना त्यांचं "ट्रेन मे झननन झननन होय रे" किंवा "राम नारायण बाजा बाजाता" असणारच. आणि संपूर्ण उत्साहात, जोशात स्वतः नाचत गात ते सादर करायचे.त्यांना बघून आम्ही पोरं कधी नाचायला सुरुवात करायचो आमचं आम्हाला पण कळायचं नाही.
ते स्वतः उत्तम कलाकार होते.नटसम्राट मधला त्यांनी सादर केलेला प्रवेश, त्यांचं उत्तम पाठांतर अजूनही लक्षात आहेत.
त्यांचे विद्यार्थी आणि भाचे त्यांच्या शिस्त आणि कडकपणा बद्दल सांगतात पण आम्ही नातवंडे म्हणून त्यांचा फक्त प्रेमळपणा च पाहिला.
प्रभाकर आजोबा कराड च्या टिळक हायस्कूल शाळेत शिक्षक होते.मुलांमद्धे शिस्तप्रिय पण तरी मिस्कील असे सर म्हणून ते प्रसिद्ध होते.
त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. गोष्टी रंगवून सांगायची उत्तम हातोटी त्यांच्याजवळ होती. कराडमद्धे त्यांच्यासोबत कुठेही गेलं तरी पावलापावला वर त्यांचे विद्यार्थी भेटायचे आणि या वयात सुद्धा अजोबा सर्वांना नावानिशी ओळखायचे आणि बॅच कोणती ते पण सांगायचे.
माझी आई सांगायची त्याप्रमाणे अतिशय कष्टात काटकसरीत दिवस काढून त्यांनी आपल्या सर्व भावंडांना आधार दिला. सर्व कुटुंबाला सक्षमपणे आपल्या पायावर उभे केले. गरज पडेल तसा सर्वांना आधार सल्ला दिला. आणि त्यांच्या या सर्व सत्कर्माचं पुण्य म्हणूनच मुलं,जावई,सुना, नातवंडं ते अगदी परतवंडाचं सुख त्यांना अनुभवायला मिळालं. कुटुंबाचं आणि आर्थिक अशा दोन्ही बाजुंनी अतिशय समृद्ध वैभव त्यांनी अनुभवलं. त्यांनी जितकं निरपेक्ष भावनेनं सर्वांवर प्रेम केलं आणि सर्वांना मदत केली त्याचं संपूर्ण दान परमेश्वराने त्यांच्या झोळीत टाकलं.
३० सप्टेंबर २०२२ ला ललितापंचमी दिवशी ते आम्हा सर्वांना सोडुन गेले.
त्यांची पोकळी आम्हा सर्वांना पदोपदी जाणवेल पण त्यातही समाधान इतकंच आहे की, सुंदर आयुष्य व्यतीत करून कमीत कमी क्लेश होऊन त्यांचा शेवटचा दिस गोड झाला.
हा अखंड उत्साहाचा झरा काल शांत झाला पण त्यांना शेवटचा निरोप देताना त्यांचा हा शांतपणा नकोसा वाटला.
आजपासुन रोज तिकडे स्वर्गात आजोबांच्या गोष्टींची आणि गप्पांची मैफल रंगेल आणि समस्त मंडळी जिवाचे कान करून त्यांच्या गप्पागोष्टी ऐकत असतील.
ति. प्रभाकर आजोबा यांना शतशः वंदन🙏🏻
-©️ स्मिता श्रीपाद
1 ऑक्टोबर 2022

प्रबोधिनीचा हा ललकार

 सकाळी नऊ म्हणजे ठीक नऊ च्या ठोक्याला विश्रामबाग वाड्याच्या चौकात ज्ञानाप्रबोधिनीच्या "श्री गजाननाचा" रथ लागलेला असतो... प्रबोधिनीचे साधारण 500 विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी असे सर्व मिळून आधीच ठरल्याप्रमाणे आपापल्या जागा घेतात. ढोल ताशा पथक, ध्वजपथक, लेझीम पथक, बरची पथक श्रींना निरोप द्यायला सिद्ध असतात. पथक प्रमुख शेवटच्या सूचना देऊन आपापल्या जागा घेतात. पाचवी ते दहावी च्या मुलांमुलींचा कल्लोळ चालू असतो.

ठीक 9.30 च्या ठोक्याला सावधान ची सूचना येते आणि भर कुमठेकर रस्त्यावर इतका वेळ चाललेला गोंगाट एका क्षणात थांबतो. फक्त एका शिट्ट्टीवर सुमारे 700-800 आजी माजी विद्यार्थी स्तब्ध उभे रहातात. ध्वज उलगडले जातात..
ध्वजनमस्ते 1,2,3.... जोडलेले हात,झुकलेल्या माना
आणि पुढच्या सेकंदाला ताशा, लेझीम आणि बरची यांचा एकत्र गजर....
टचकन डोळ्यात पाणी येतं...
"प्रबोधिनीची शिस्त" असं इतके दिवस नुसतं ऐकून होतो पण आज त्याचा हा असा अनुभव शब्दातीत होता.
त्यापुढचे दोन तास अत्यंत सुरेख,शिस्तबद्ध मिरवणूक पाहिली.लेझीम, बरची, ढोल ताशा यांची सुंदर जुगलबंदी, बाप्पा च्या घोषणा, पुन्हा लहान होऊन नाचणारे माजी विद्यार्थी, जोशपूर्ण ध्वजपथक अशी अत्यंत दिमाखदार मिरवणूक ठरलेल्या वेळेत शाळेजवळ जोंधळे चौकात थांबली. तिथे परत एकदा एका ताला सुरात गणरायाची आरती, मंत्रपुष्पांजली होऊन आणि प्रबोधिनी प्रार्थना होऊन मिरवणुकीची सांगाता झाली.
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे लोकमान्य टिळकांना नक्की काय अपेक्षित होतं ते आज पहिल्यांदाच कळलं.
प्रबोधिनीचे सर्व शिक्षक, युवती विभाग, युवक विभागाचे सर्व ताई दादा, पालक संघ आणि सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.
आम्ही प्रबोधिनीचा भाग आहोत याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे.
1-2-3-4 गणपतीचा जयजयकार
1-2-3-3-4 प्रबोधिनीचा हा ललकार
बोला गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
- ©स्मिता श्रीपाद
अनंतचतुर्दशी,2022