Wednesday, July 23, 2025

*अग्निशिखा*


 

*अग्निशिखा*

काळोख्या संध्याकाळी
अंधार पसरतो जेव्हा
उजळते दिशा या साऱ्या
मी होऊन पणती तेव्हा
हृदयाच्या खोल तळाशी
पसरतो तिमिर दुःखाचा
मी शांत तेवती समई
जणू किरण तुला आशेचा
दाटती मेघ अवकाशी
तम कवेत घेतो अवनी
नभ तेजाळून टाकाया
मी वीज चमकते गगनी
कधी असेन साधी ठिणगी
कधी ज्योत शांत तेवती
पण ठाऊक माझे मजला
मी अग्निशिखा तळपती
-©️स्मिता श्रीपाद
दीप अमावस्या 2025

आषाढी वारी


 

सावळा विठोबा, साजिरी रखुमाई |

बाप आणि आई, आले घरा ||
देखणे ते रूप, पाहुनिया डोळा |
प्रेमाचा उमाळा, दाटे मनी ||
सुंदर ते ध्यान, घेता डोईवर |
संसाराचा भार, उतरला ||
-©️स्मिता श्रीपाद
आषाढी वारी 2025

युद्ध

 अंगावरची ओली हळद वाळायच्या आधीच

नव्या नवरीला निरोप देउन एक जवान लढायला जातो..
तो सीमेवर तुमच्या आमच्यासाठी लढतो तेव्हा
त्याच्या सुरक्षेसाठी इथे लढत असतं कोणीतरी...नियतीशी
लेकाच्या कानशिलावर बोटं मोडुन
त्याला युद्धावर पाठवणारी म्हातारी आई,
मनावरचा अदृश्य दगड सांभाळत बघत बसते
"मदर्स डे" चे फोटो,रील्स आणि स्टेटस
आपल्या बाळासोबत फोटोत हसणारा जवान,
परत कधीही न येण्यासाठी निघुन जातो.
आपल्या आत कितीही काहीही हललं तरी
त्या दु:खाचं ओझं नाहीच पेलु शकणार आपण
समाजमाध्यमांवर तावातावाने एकमेकांशी "चर्चा करणारे"
राजकीय, शाब्दीक युद्ध खेळणारे
युद्धाचा इव्हेंट बनवून ब्रेकिंग न्यूज वगैरे बनवणारे
काही दिवस फक्त शांत बसुन
प्रार्थना का नाही करु शकत ? ..आपल्याच सैनिकांसाठी ?
युद्ध करणं ही आपली निवड नाही, नाईलाज आहे.
आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी उचललेलं पाउल आहे.
हे कधी आणि कसं समजावणार आपण
फटाके उडवुन "सेलिब्रेट" करणार्या ‘देशभक्त’ लोकांना ?
सात आठ वर्षांच्या निरागस लेकीचा
प्रेमळ निरोप घेउन सीमेवर गेलेला एक बाप,
आज तिरंग्यात लपेटुन परत आलाय...
लेकीच्या गालावर अखंड अश्रु होउन बरसतोय...
युद्ध कशाला ? म्हणुन आधी गळे काढणारे
आणि आता युद्ध का थांबवलं ? म्हणत परत गळे काढणारे
या सगळ्यांना त्या लेकीचं सांत्वन करता येईल ?
युद्ध म्हणजे काय ? ते तिला विचारुयात....
-©️स्मिता श्रीपाद
बुद्धपौर्णिमा 2025

आनंदाचे झाड


 

सुखदुःखाच्या चक्रामधुनी उलगडते जगण्याचे कोडे

पळता पळता पाऊल थकले ? वळणावरती थांबू थोडे
नवी पालवी जपता जपता पानगळीला अलगद झेलू
नात्यांमधले नाजूक गुंते साऱ्या गाठी हळूच उकलू
मुक्त मानाने अनुभवताना ऋतुचक्राचे येणे जाणे
सदा अंगणी बहरत राहो “आनंदाचे झाड" देखणे
-स्मिता श्रीपाद
19 एप्रिल 2025

कौसल्येचा राम


 

"कबीराचे विणतो शेले,कौसल्येचा राम बाई

भाबड्या या भक्तासाठी देव करी काम"
तो आलाय स्वतः..
तुमच्यासमोर बसलाय..
तुमच्या आयुष्याचा एक एक धागा विणतोय..
प्रत्येक श्वासाचा नवा धागा
प्रत्येक दिवसाचा नवा धागा..
"एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ...राजा घनश्याम"
तुम्ही डोळे मिटून त्याचा धावा करण्यात मग्न..
आणि तो.. ?
तुमच्या संचिताचे धागे जोडायच्या प्रयत्नात..
जे काही विणलं जातंय ते सुंदरच दिसावं
असा त्याचा प्रयत्न...
"विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम"
तुमच्या नकळत त्याने घेतलीये काळजी..
सुख, दुःख, राग, लोभ, प्रेम, द्वेष, आनंद, चिंता
असे सगळे धागे जोडून..
तुमच्या आयुष्याचा शेला विणलाय त्याने...
धागे कसेही असो..कोणतेही असो...
अंती दिसतंय ते फक्त "रामनाम" 🙏🏻
"हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ? कुठे म्हणे राम ? कुठे म्हणे राम ?"
डोळे उघडायला जरा उशीर झाला का ?
अखंड आयुष्याचा शेला सुरेख धाग्यात गुंफून
तो श्रीराम गेलाय कुठे ?
कुठे शोधू ? कसं शोधू ?
आणि मग अचानक लख्ख दिसला..
सावळी, सुंदर, तेजाळ, आश्वासक मूर्ती...
इथेच आहे तो... कायम सोबत..
तुमच्या आमच्या अंतरंगात...
श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🏻
-©️स्मिता श्रीपाद
रामनवमी 2025

आपलीच कविता

 "मनू, मराठीच्या पेपर चा अभ्यास झाला का ? "

"हो, झाला. एक धडा आणि एक कविता आहे. धड्याच्या नोट्स मी आधीच काढल्यात आणि अगं 'आपलीच कविता' आहे.
"मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी.."
"हो का ? "
"ती तर मला लहानपणापासूनच पाठ आहे "
आपलीच कविता🤗..इतकं सहज बोलून गेली लेक...
मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायचे हे सूर कसे संवादी
अंदमान च्या तुरुंगात असताना सावरकरांना लेखन करण्यासाठी तुरुंगाच्या दगडी भिंतीने कशी मदत केली असेल अशी कल्पना करून लिहिलेली ही कविता, मी आणि माझी बहीण खूप लहान असल्यापासून आई झोपताना आम्हाला म्हणून दाखवायची.
अगदी सातवी आठवीत असेपर्यंत आम्हा दोघीना झोपताना आई खूप कविता आणि गाणी म्हणून दाखवायची.
"रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा"
असं गाताना हिरवीगार गवताची कुरणं आणि त्यावर डोलणारी चिमुकली फुलं दिसायची डोळ्यासमोर
"ऐलतटावर पैलतटावर हिरवाई घेऊनि
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी"
या कवितेत शेवटी
"पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबरं"
असं म्हणालं कि मला डोळ्यासमोर एक पांढरी दाढी असलेला म्हातारा औदुंबर बाबा दिसायचा. तो दिवसभर त्या छोट्याश्या गावातून, शेतांमधून, पायवाटांवरून फिरत फिरत पाण्याशी पोचलाय आणि मस्त पाण्यात पाय टाकून पाणी उडवत बसलाय असं काहीसं चित्र दिसायचं.
पुढे एकदा औदुंबर ला गेल्यावर तिथली नदी, नदीच्या दोन्ही बाजूला असलेली गर्द हिरवाई, नदीतल्या छोट्या होड्या, त्यात बसून नदीच्या पलीकडे देवीच्या दर्शनासाठी आई आजीसोबत जाताना ती कविता समोर प्रकट झाली.
"लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनि दुसऱ्या लाख"
हे आईचं फार आवडतं गाणं. मला कधी कधी ते ऐकायला नको वाटायचं कारण,
"कुणी गेली होती गाय तुडवुनी तिजला
पाहुनि दशा ती रडूच आले मजला"
अशा ओळी ऐकताना घशात दुखायला लागायचं उगीचच.
पण मग कवितेतली मुलगी ती फाटकी मळकी बाहुली घरी घेऊन यायची तेव्हा बरं वाटायचं.
"मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडूनं
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी"
असा त्याचा शेवट ऐकून त्या मुलीबद्दल प्रेम,आदर वाटायचा.
"या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार"
"दीपका मांडिले तुला सोनीयाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट"
"राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या"
"गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या"
"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे"
अशा अनेक सुरेख कविता आणि गाणी ऐकून ऐकून आपोआप तोंडपाठ झाली होती. त्यावेळी त्याचे अर्थ नीटसे कळले नव्हते.
इयत्ता पाचवी ते दहावी दरवर्षी जून महिन्यात नवीन पुस्तकं आणली की आई बालभारतीचं पुस्तक हातात घेऊन बसायची. त्यातल्या सगळ्या कविता आणि धडे वाचून काढायची. आवडलेल्या कविता 'किती सुंदर कविता आहे ऐक' असं म्हणत मोठ्यांदा वाचायची.
एके वर्षी असंच शांता शेळकेंची पैठणी कविता आईनं आम्हाला वाचून दाखवली आणि त्यातलं शेवटचं कडवं वाचताना तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.
"अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले"
आईच्या आजीचं म्हणजे माझ्या पणजीचं नुकतंच निधन झालं होतं त्यावर्षी. तिच्या आठवणीने आई हळवी झाली होती.आईचं हे कविताप्रेम हळूहळू नकळत माझ्यात झिरपत गेलं.
पुढे मग कॉलेज, लग्न, संसार या धावपळीत नवीन कविता सापडल्या आणि त्या बालपणीच्या कविता जरा मागे पडल्या. तरी अधूनमधून कुठल्यातरी मासिकात आलेली किंवा नंतर whatsapp वर आलेली सुरेख कविता आई पाठवत राहिली.
पुढे मला बाळ झाल्यावर परत एकदा आईच्या कवितांना श्रोता मिळाला 😃. मधुजा अगदी लहान असल्यापासून तिला मांडीवर झुलवताना आईच्या कविता सुरु झाल्या आणि त्याचबरोबर माझी उजळणी.आता सगळ्या कवितांचे अर्थ नव्याने कळायला लागले.
"मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहुनही लहान रे
तुझ्यासंगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे
तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या"
असं माझ्या 3-4 महिन्यांच्या बाळाला थोपटताना तल्लीन होऊन आई गायची तेव्हा त्या चित्राची दृष्ट काढून ठेवावी असं वाटायचं.
"गा रे राघू गा गं मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटा मटा जेवी
आयुष्याने थोर कर माये कुलदेवी"
असं तिनं म्हटलं कि माझ्या डोळ्यात टचकन पाणी यायचं.
"पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या"
या कवितेतलं वर्णन ऐकलं की हे अगदी आईच्याच घराचं वर्णन वाटायचं.
झोपताना गाणी ऐकायची सवय लेकीला पटकन जडली आणि पुढे मीसुद्धा हि पद्धत चालू ठेवली. मनू लहान असताना तिचे एका एका गाण्यांचे दिवस असायचे. त्या दिवशी एकच गाणं लूप मध्ये परत परत गायचं. 'रंगरंगुल्या सानसानुल्या' हि कविता एके दिवशी तरी मी तब्बल 15-20 वेळा गायली होती 😃. नंतर नंतर झोपेमुळे शब्द गडबडायला लागले तरी कन्या जागीच 😂
हळूहळू ती मोठी व्हायला लागल्यावर "कवितेतला अमुक एक शब्द म्हणजे काय ?" असे प्रश्न पडायला लागले.
मग समजेल तसा अर्थ सांगायचं प्रयत्न केला.
आज सकाळी जेव्हा तिनं "आपलीच कविता" असा उल्लेख केला तेव्हा मनापासून आनंद झाला मला. आणि मग ती कविता म्हणता म्हणता आईच्या आठवणी दाटून आल्या.आई कितीतरी रुपाने आमच्यात आत आत खोलवर अशी रुजली आहे ते जाणवलं. हि "आपलीच कविता" अशीच पुढे पुढे पोचत राहील याची खात्री आहे.
आज आईचा वाढदिवस, तिची आठवण सदैव मनात असतेच पण आजच्या दिवसाच्या निमित्ताने या कवितांच्या आणि अंगाईच्या आठवणी जागवाव्याशा वाटल्या.
प्रिय आई, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🤗🤗
-तुझीच ताई
27 मार्च 2025