Monday, August 31, 2009

स्वप्नं

कॉलेज चे दिवस म्हणजे खरोखरच इतके सुंदर,अलवार..जणु रंगीबेरंगी नाजुक फुलपाखरुच...सगळ जगं खुप खुप सुंदर आहे असा विश्वास देणारे...शाळेपर्यंत आपल्याच कोषात मग्न असलेल्या माझ्यासारख्यांना तर अचानक बर्‍याच गोष्टींचा साक्षात्कार होतो....अचानक सगळं बदलून जातं..कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगावर कवीता वगैरे सुचु लागतात...अशीच फुलपंखी दिवसात केलेली ही कवीता...

चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे,

अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे......

दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा,

वार्‍यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा......

अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,

तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे...........

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,

स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे...........

तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे,

वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे..........

मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,

इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच साथ असावी...

बी.जे. मेडीकल कॉलेज मद्धे दरवर्षी गणेशोत्सवात आंतरमहाविद्याययीन स्पर्धा चालु असायच्या...अशाच एका वर्षी बी.जे. च्या "वेदांत" मद्धे "काव्यवाचन" स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाले होते...पुण्यात ते सुद्धा आंतरमहाविद्याययीन स्पर्धेत सहभागी व्हायचा पहिलाच प्रसंग होता....तिथे ही कवीता सादर केली होती...आणि पाडगांवकरांची "चिउताई"... निकाल जाहीर होताना एकदम आरामात होते कारण आपल्याला काही बक्षिस मिळणार नाहीच हे गृहीत धरलं होतं...ईतक्या विविध कॉलेजेस मधुन सहभागी झालेल्या मुलांनी ईतक्या भारी भारी कविता सादर केल्या होत्या..की त्यापुढे माझी कविता म्हणजे उगीच आपलं..."र" ला "र" आणि "ट" ला "ट" जुळवलेलं आहे असं वाटलं होतं... आणि बक्षिस जाहीर झालं...उलट्या क्रमाने...
तृतीय क्रमांक : अमुक
द्वितीय क्रमांकः तमुक
आणि
प्रथम : चक्क त्यांनी माझं नाव पुकारलं......आणि मिनलने त्याचक्षणी घट्ट मिठी मारली मला....:-) इतकं मस्त वाटत होतं ना तेव्हा....आपण आपल्या कॉलेज साठी बक्षिस मिळवुन आणलं आहे याची जाणीव झाली एकदम..सोबतच्या सगळ्यांनी "एम्.आय्.टी." चा नुसता गजर केला होता आख्या सभागृहात... :-)

आणि नंतर लगेचच तिथे कँप मधेच "मार्जोरीन" ला पार्टी ...खिशात पैसे नसताना एका मित्राकडुन उधार घेउन केलेली ती पार्टी आठवुन आता हसायला येतं...खरतर आता ही कवीता वाचुनच फार हसायला येतं.....:-)ईतकी साधीसुधी कविता तर कोणीपण लिहु शकेल असं वाटतं आता :-)..

आज अचानक त्या ५-६ वर्षापुर्वीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आल्या....आणि "वेदांत" च्या सुद्धा...
पण कशीही असली तरी ही कविता मला अतिशय प्रिय आहे...कारण ती मला आठवण करुन देते...सायनाकर कडुन उधार घेउन दिलेल्या त्या "पार्टीची" आणि
बक्षिस जाहीर होताच मिनलने मारलेल्या त्या मिठीची ... ...
खरचं....Those were the Best Days of My Life...

Saturday, August 29, 2009

घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....







कधी कधी एखादी गोष्ट मनासारखी झाली की इतका आनंद होतो.. आणि मग कसा व्यक्त करायचा हा आनंद असा पूर्वी पडणारा प्रश्न आता नाही :-)..थँक्स टु ब्लॉगवर्ल्ड...:-)
यावर्षीचे मोदक फार छान साधले गेले...मनासारखी सुरेख उकड जमली...आणि सुरेख कळीदार एकसारखे मोदक करता आले...इतकं इतकं छान वाटलं ना....आईचं तर असं झालं होतं की लेकीचं किती कौतुक करु आणि किती नको...सगळ्या येणार्‍या जाणार्‍यांना ४-४ वेळा सांगुन झालं ...
"आज स्मिता ने इतके चुटचुटीत मोदक केले ना...मलापण जमत नाहीत इतके सुरेख....त्या कोणा अमुक-तमुक आत्याच्या घरात कोणालाही अजुनी करता येत नाहीत मोदक..तिचा आता ३२ वर्षाचा संसार झाला तरी तिचे मोदक चुकतात्...एक ना दोन..आईचं संपतच नव्हतं.... "
कसं असतं ना....आईनेच शिकवले मोदक मला....
जितकी तांदुळ पीठी तितकंच पाणी घ्यायचं...त्या पाण्यात थोडं तेलं किंवा लोणी..आणि मीठ घालायचं....आणि पाण्याला तळाशी बुडबुडे येताना दिसले की लगेच पीठी टाकुन भरभर हालवायचं...आणि झा़कण ठेवुन मस्त २-३ वाफा काढायच्या..मग तेलापाण्याचा हात घेउन उकड गरम असताना भराभर मळायची..हाताला न चिकटणारी उकड साधली की पुढचा सगळा कलाकुसरीचा मामला....उकडीचा छोटा गोळा घेउन पारी करायची..त्याला चुण्या काढायच्या..आणि मधे सारण ठेवुन चारी बाजुनी नाजुक हाताने चुण्यांना एकत्र आणायचे.....वरती छोटुसं टोक काढायचं...कसं सुचलं असेल ना हे सगळं कोणालातरी...
आणि माझ्यापर्यंत आईनेच तर पोचवलं हे सगळं...यावर्षी जरा चुकली असेल तिची उकड काढताना...पण म्हणुन लेकीचं किती कौतुक...पण तिला एक गोष्ट सांगावीशी वाटली मला...

"अगं माझे मोदक छान जमले हे तुझचं तर देणं आहे ना....शेवटी काय...
देणार्‍याने देत जावे...घेणार्‍याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत....
आज मी माझ्या आईचे हात घेतले होते...."
थँक्यु आई.."


Friday, August 28, 2009

ये गं गौराबाई...

ये गं गौराबाई...सुख देउन जाई....
वाट तुझी बघतुया..शंकर भोळा गं..
अन कपाळाला शोभतुया..कुंकवाचा टिळा गं...

दरवर्षी गौर सजवताना हमखास आठवतच हे गाणं....माझ्या आईकडच्या गौरी म्हणजे खड्याच्या..गंगागौरी.....त्यावेळेस उभ्या गौरींबद्दल फारसं माहितीच नव्हतं कधी....एक छोटा हळद-कुंकवाची बोटे माखलेला कलश,त्यात कसली कसली तरी गौरीची पानं,फुलं,पूजेचं सगळं सामान..म्हणजे हळद-कुंकु,अक्षता,गेजवस्त्र,खिरापत असं सगळं घेउन मी आणि श्वेतु नदीवर जायचो...तिथे मग सोबतच्या ताया,काकवा,मावश्या सांगतील तशी पूजा करायची...नदीपात्रातले दोन खडे घ्यायचे...एक जेष्ठा..एक कनिष्ठा....त्यांची पूजा करुन कलशात ठेवायची...मग आरती,नैवेद्य...असं सगळं करुन नदीतल्या पाण्यानेच तोंडात चूळ घ्यायची...आणि कोणाशीही न बोलता घरापर्यंत ती चूळ तशीच तोंडात धरुन यायचं....

यामागचे शास्त्र मला कधी कळले नाही..पण आता असे वाटते की गौरीला घरी घेउन येताना आजुबाजुच्या लोकांशी न बोलता फक्त तिच्याशीच एकरूप होउन यावं असा काहीसा हेतु त्यात असेल...म्हणजे कसं की तोंडातलं पाणी बाहेर पडु नये म्हणुन कोणाशी बोलायचं पण नाही आणि चुकुन ते पाणी गिळलं जाउ नये म्हणुन सगळं मन स्वत: कडे एकाग्र करायचं....थोडक्यात काय तर स्वतः गौरीस्वरूप व्हायचं...पण त्यातही एकमेकींना खाणाखुणा करुन गप्पा सुरुच असायच्या म्हणा....असो...लहानपण किती निरागसं,गोड असतं....

मग घरापाशी आलं की आई तयारचं असायची औक्षणासाठी...इतका वेळ चालुन दमलेल्या पायांवर छान गरम गरम पाणी,मग गरम दुध..आहाहा..सगळा शिणवठा सेकंदात गायब व्हायचा...मग गौरीला..आणि गौर आणणार्‍या आम्हा दोघीना ओवाळणं व्हायचं...
मगं आम्ही म्हणायचं.. "गौर आली गौर...."
मग आई विचारणार..."कशाकशाच्या पावलांनी आली..?"
मग तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची...."सोन्यामोत्याच्या पावलांनी आली...."
मग सगळ्या घरभर फिरुन गौर..म्हणजे आम्ही दोघी विचारणार्..."ईकडे काय...?"

मग आई उत्तर देणार्...."ईकडे दिवाणखाना..ईकडे दूधदुभते...ईकडे तिजोरी....ईकडे देवघर....ईकडे बागबगीचा...."
गौर नक्की कोण आहे? माझ्या हातातल्या कलशात ठेवलेले ते दोन खडे...की मी आणि माझी छोटी बहीण...?

मग सगळ घरदार फिरुन गौराबाई बाप्पांशेजारी विराजमान व्हायच्या....शेपू भाजी-भाकरी चा आस्वाद घ्यायच्या...तिला आल्यावर भाजी भाकरी का लागत असेल या प्रश्नाचं उत्तर लग्नं झाल्यावर कळलं....

माहेरी आल्यावर "तायडु भाकरी झाली बघ गरम...सुरुवात कर तु खायला...असं म्हणत..ताव्यावरुन थेट ताटात येणारी भाकरी पूरणपोळी पेक्षा जास्त गोड वाटते..." (माझ्या सुदैवाने सासरी पण मला ही चैन असते)
गौर म्हणजे काय शेवटी "माहेरवाशीण"च की....
दुसर्‍या दिवशी मात्र भरपूर तूप सोडलेली पूरणपोळी..... :-)

पुढे मोठी झाल्यावर कर्‍हाड सोडुन शिकायला पूण्यात आले...ईथे आल्यावर पहिल्यांदाच उभ्या गौरींचा अनुभव घेतला तो अंजली आज्जीच्या घरी...अंजली आज्जी म्हणजे आईची सगळ्यात धाकटी मामी....आणि आता माझी सासु ;-)...

"मलापण उभ्या गौरी बसवणारे सासर पाहिजे आहे" असं एके वर्षी तिच्या घरच्या गौरी बसवताना सहज तोंडुन निघुन गेलं...आणि माझी गौराबाई "तथास्तु" कधी म्हणाली ते कळलंच नाही.... तेच घर सासर म्हणुन लाभलं..:-)

माझ्या सासरच्या गौरींचा थाट निराळाच....माझ्या पणजीपासून ( म्हणजेच आज्जेसासुबाईंपासुन..) चालत आलेले सुरेख पितळी मुखवटे...१ दिवस आधी या मुखवट्यांना छान घासुन-पुसुन लखलखीत करायचं....मग त्यांचे भुवया,डोळे,ओठ,कुंकु, केस रंगवायचे...लोखंडी स्टॅडला साड्या नेसवायच्या...या साड्या नेसवताना कोण धांदल उडते....एकीची साडी पटकन मनासारखी नसवुन होणार्...आणि दुसरीची साडी ३-४ वेळा सोडुन परत परत नेसवायला लागयाची....आपल्या मनासारखी जमेपर्यंत...

मगं आज्जीचं नेहेमीचं वाक्या..."अगं जेष्ठा साडी नेसवायला फार त्रास देत नाही....पण कनिष्ठा म्हणजे लहान ना.....जरा त्रास देणारच..":-)....

आणि खरच...दोन्ही मुखवटे कितीही सारखे रंगवले तरी आज्जी म्हणते तसं...एक मोठी आणि एक लहान जाणवत राहाते...असं कसं होत असेल गं आज्जी ....असं म्हणलं...की आज्जी हसुन म्हणते..."अगं म्हणुनचं त्या जेष्ठा-कनिष्ठा आहेत ना " ..:-)

मग त्यांना दोघींना दागिने घालायचे...मुकुट,चिंचपेटी,कानात कुड्या,हातात बांगड्या,कंबरपट्टा,कोल्हापूरी साज,श्रीमंत हार्,मंगळसूत्र...आणि सगळ्यात शेवटी नथ....हे सगळ करायला इतकं छान वाटतं ना....आपलं आपल्यातच असणं...साड्या नेसवलेल्या स्टॅडवर मुखवटे बसवले की पाहात रहावं असं वाटतं....ते तेजस्वी ,सोज्वळ,शांत मुखवटे आश्वासन देत असतात..."आम्ही आहोत ना आता...सगळ्या काळज्या आमच्यावर सोडा आणि निर्धास्त व्हा..."

Wednesday, April 15, 2009

खमंग,खुसखुशीत,खुमासदार थालिपीट...आणि पौष्टिकसुद्धा...


प्रसंग १ :
पावसाळ्याचे दिवस आहेत....आपण मुसळधार पावसातुन भिजत भिजत नुकतेच घरी आणि त्यातही माहेरी...पोचलो आहोत...आता २ दिवस माहेरी आराम म्हणून आपण जाम म्हणजे जाम खुष आहोत ...कॄपया लग्न झालेल्या पुरुषांनी दातओठ खाउ नयेत बायकोला कधीकधी माहेरी जाउ द्यावे (ह.ध्या.)...आज शुक्रवार आहे ...म्हणजे आता २ दिवस मज्जा ..आपण घरात येतो..मस्त फ्रेश होउन कपडे बदलतो....आणि आई भूक असं ओरडत स्वयंपाकघरात घुसतो....आणि गरम गरम...वाफाळत्या..खमंग थालिपीटाची डिश हातात येते ...
प्रसंग २:
मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहेत...आपण पहाटे पहाटे ( प्रत्येकाने स्वतःला झेपत असलेली वेळ वाचावी ..)मस्त फिरुन वगैरे आलेलो आहोत (कधी नव्हे ते ...)घरी पोचताच आपल्या लाडक्या "आई" (म्हणजे सासुबाई...सुज्ञांना कळलेच असेल म्हणा..) आपल्यासमोर गरम गरम..खुसखुशीत थालिपीट घेउन येतात...आहाहा..
प्रसंग ३:
उन्हाळ्याचे दिवस आहेत...आमरस-पुरी वरपुन ४-५ तास झालेले आहेत्..मस्त झोप झालेली आहे....५ वाजता जाग येते आणि आता काहितरी खमंग ,चमचमीत ,तिखटं खायची इच्छा होते....मग आपण मस्तपैकी थालिपीट बनवायला घेतो.. (आई झाली,सासुबाई झाल्या ..आता कोणाला आणायचं इथे, असा विचार करताना..आज्जी डोळ्यांपुढे आली...पण मग तुम्हाला वाटेल कि हि स्मिता स्वतः काही करते कि नाही..म्हणुन या स्टोरीत मीच घुसले )..त्या खमंग वासाने मन भरुन येते ( आणि थोड्यावेळाने पोटही..)
तर मंडळी ...सांगायचा मुद्दा हा..कि कुठल्याही ॠतुत फिट होणारं हे थालिपीट...
साहित्यः२ वाटी ज्वारीचे पीठ२ चमचे कणिक२ चमचे डाळीचे पीठ१/२ वाटी रवाथालिपीटाची भाजाणी असेल तर अजुनच उत्तम.....
३-४ हिरवी मिर्ची + ७-८ पाकळ्या लसुण याचे वाटणंचवीनुसार तिखट,मीठहळद,ओवा,हिंग..
आणि सगळ्यात महत्वाचे...भरपुर भाज्या..२ कांदे बारीक चिरुन,१ वाटी मेथी बारीक चिरुन,१ गाजर खिसुन,थोडा खिसलेला कोबी,मुळ्याची कोवळी पाने चिरुन,कोथिंबीर,
थोडक्यात काय तर शक्य होइल तेवढा पालापाचोळा.......अगदीच शेपु ,कारलं वगैरे नको बरका...असो..
आता कॄती: अगदीच शिंपल आहे हो....वरील सगळेच्या सगळे पदार्थ एकत्र करायचे...पाण्याचा वापर करुन ( किवा शिळी आमटी /वांग्याची भाजी अश्या गोष्टी पण खपुन जातात्.. नव्हे..मस्तच लागतात...)थालिपिटाचा गोळा भिजवायचा...आणि तव्यावर भरपुर तेल सोडुन खरपुस भजुन घ्यायचं...
आणि मग्.....लोणी,दही,लोणचं,चटणी,सॉस,तुप....जे आवडेल त्यासोबत खायला सुरुवात करावी.


Monday, April 13, 2009

मनातला चैत्रं...!!!

उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्‍याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्‍हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!!
आमचं कर्‍हाड हे तसं छोटंसच गाव....(म्हणजे आता पुण्यात रहायला लागल्यापासुन मला कर्‍हाड छोटं वाटतं...:-) ) दोनचं मुख्य बाजारपेठा....आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेली वसाहत....चावडी चौक ते दत्त चौक आणि चावडी चौक ते पांढरीचा मारुती ईतपतच आमचं विश्वं पसरलं होतं....आजकाल विकसित झालेला विद्यानगर हा भाग, त्यावेळी मुख्य भागापासुन फार फार दूर वाटायचा....कृष्णा नदीच्या पलिकडचे विद्यानगर म्हणजे कर्‍हाडच्या शेजारचं दुसरं गावच आहे की काय असं वाटायचं मला लहानपणी...सोमवार पेठ,कन्या शाळेचा परिसर,पंतांचा कोट..आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "प्रितीसंगम" आणि कॄष्णाबाईचा घाट एवढचं माझं वर्तुळ होतं.
आमच्या घरापासुन अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर "प्रितीसंगम" होता.कॄष्णा आणि कोयना नदीचा सुरेख संगम प्रितीसंगम म्हणुन प्रसिद्ध आहे.या दोन्ही नद्या समोरासमोरुन येतात आणि एकमेकींना भेटतात...आणि मग या दोन मैत्रिणी एकमेकींच्या गळ्यात गळे घालुन,एकरुप होवुन,पुढच्या जगाला प्रसन्न,पवित्र करण्यासाठी,मैत्रिच्या संदेश सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी पुढे जातात्..."कॄष्णा" असं एकचं नाव धारण करुन.....!
अथांग पसरलेलं नदीचं पात्रं... नदीशेजारचं विस्तिर्ण वाळवंट.. नदीकडे तोंड करुन उभं राहिलं की डावीकडे स्वर्गीय श्री.यशवंतरावजी चव्हाण यांची सुरेख बांधलेली संगमरवरी समाधी..आणि नगरपालिकेने फुलवलेली सुरेख बाग आहे.समाधीच्या आजुबाजुला छोटी छोटी रेखीव मंदीरे आहेत. ही सगळी मंदिरे १९६७ साली आलेल्या प्रचंड मोठ्या पुरातुन वर आली असं लोक सांगतात. उजवीकडे ग्रामदेवता कॄष्णाबाईचे मंदीर आहे..या देवळासमोरुन थेट नदीच्या वाळवंटापर्यंत उतरत जाणार्‍या घाटाच्या पायर्‍या आहेत. काळ्याभोर दगडातुन या विस्तीर्ण पायर्‍या बांधल्या आहेत....पायर्‍या जिथे संपतात तिथे मोठे दगडी बुरुज आहेत.. कृष्णाबाईच्या देवळाच्या आजुबाजुला गणपती,शंकर,कृष्ण अशी विविध मंदीरे आहेत.
माझ्या घरापासुन ते घाटापर्यंत संपूर्ण उताराचा रस्ता होता.ज्या दिवशी परीक्षा संपेल त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांच्या सायकली त्या उतारावरुन सुसाट सुटायच्या...ते थेट घाटावर . मग आम्ही सगळ्याजणी नदीपात्रात जायचो.नदीत मोठे मोठे दगड होते..खोल पाण्यात असलेला सगळ्यात मोठा दगड पकडण्यासाठी आमची शर्यत लागायची.दगडावर बसुन पाण्यात पाय सोडुन गप्पा चालायच्या...पाण्यातले छोटे छोटे मासे पायावरुन सुळकन फिरायचे...पायाला गुदगुल्या करायचे..पाण्यात हात घालुन मासा पकडायचा असफल प्रयत्न करायचो ...पण ते कुठले हातात यायला...आता आठवुन लिहितानाही पायाला गुदगुल्या होतायतं :-)..पाण्यात पाउल गोरेदिसते आणि पाण्याबाहेर काढलं की कमी गोरं दिसतं..असं का?..यावर चर्चा व्हायची.मग कोणाचे पाउल जास्त गोरं आहे यावर दंगा ... एकमेकींच्या अंगावर पाणी उडवायचा खेळ व्हायचा ...पाण्यात बुडणारे केशरी सूर्यबिंब पाहत अचानक सगळ्याजणी स्तब्ध व्हायच्या...आणि मग झुपकन कोणी अंगावर पाणी उडवायची...आणि परत दंगा सुरु...मग वरती बागेत येउन पळापळी,लंगडीपळती,आंधळी कोशींबीर असे खेळ व्हायचे.खळुन खेळुन दमलो की मग मोर्चा खाउकडे...भेळ,पाणीपुरी,पावभाजी ,बटाटेवडा..अशा पदार्थांचा फाडशा पडायचा.
आमच्या शि़क्षण संस्थेच्या दोन्ही शांळांची परीक्षा एकच दिवशी संपायची.त्यामुळे त्या दिवशी घाटावर सगळीकडे मुलामुलींची गर्दीच गर्दी दिसायची..अचानक अमच्या शाळेतल्या सगळ्या भिंती गायब झाल्या आहेत...बेंच काढुन टाकले आहेत आणि त्याऐवजी सगळीकडे हिरवळं पसरली आहे...शाळेच्या वरचे छतं अचानक उडुन गेले आहे...आणि खांबांची मोठमोठी झाडे झाली आहेत...असं काहीतरी वाटायला लागयचं...घाट म्हणजे जणु दुसरी शाळाच...:-)
गुढीपाडवा नेहेमी परिक्षेच्या काळात यायचा..त्यामुळे मग मस्त आम्रखंड खाउन झोपावं म्हटलं तर अभ्यासाचं भूत डोळ्यासमोर नाचायचं...पण रामनवमी होता होता परिक्षा संपलेली असायची आणि चैत्रोत्सवाची चाहुल लागायची...तिजे दिवशी गौरीचे देव्हार्‍यात आगमन व्हायचे..आता पुढचा एक महीना गौराबाई देव्हार्‍यात पेश्शल आसनावर विराजमान व्हायची..आई दारात चैत्रांगण काढायची...तिजे दिवशीच गौरीसाठी अंब्याची डाळं आणि पन्हे असा नैवेद्य व्हायचा...आणि मग कृष्णाबाईच्या उत्सवाची वाट पाहणं सुरु व्हायचं...
गौरीच्या पहिल्या तिजेपासुन ते थेट अक्षयतृतीये पर्यंत रोज कुठे ना कुठे हळदीकुंकु व्हायचं...आणि याच काळात हनुमान जयंतीपासुन पुढे चार दिवस घाटावर चैत्रातला कृष्णाबाईचा मोठा उत्सव व्हायचा. नदीच्या वाळवंटात मोठा मंडप उभा रहायचा.आणि बुरुजावरती एक मोठं स्टेज बनवलं जायचं.विविध कलाकार चार दिवस तिथे आपली कला रसिकांसमोर सादर करायचे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची पालखीतुन मिरवणुक निघायची.देवी वाजत गाजत मिरवत नगरप्रदक्षीणा करायची....रस्तोरस्ती तिच्या स्वागतासाठी मोठमोठ्या रांगोळ्या रेखलेल्या असायच्या... चौकाचौकात पालखी थांबायची.. सुवासिनी देवीला ओवाळायच्या...ओटी भरायच्या...आणि मग देवी आता चार दिवस देउळ सोडुन नदीच्या शेजारी,खर्‍या कृष्णेला भेटायला,तिची विचारपूस करायला ,वाळवंटातल्या मंडपात जायची आणि उत्सवाला सुरुवात व्हायची.मग रोज दिवसभर भजन,किर्तन,प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम मंडपात व्हायचा...आणि संध्याकाळी उन्हं उतरली की मग स्टेज वर विविध कलाकार कार्यक्रम सादर करायचे.मराठी गीतांचा वाद्यवॄंद,कथाकथन,एकपात्री प्रयोग,नाटके असे विविध कार्यक्रम पहायला लोकांची झुंबड उडायची...
त्या चार दिवसांपैकी सगळ्यात महत्वाचा दिवास म्हणजे "सार्वजनिक हळदीकुंकु".सगळ्या सुवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी,तिला पन्हे आणि डाळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी यायच्या...आणि मग मंडपात भेटलेल्या ईतर स्त्रीयांना पण हळदीकुंकु द्यायच्या.अशा वेळी समोरची बाई ओळखीची नसली तरी चालायचं ... एकमेकींशी ओळख करुन घेणे एवढा एकच उद्देश असावा कदाचितं...आणि मग बोलताबोलता कुठुनतरी ओळख निघायचीच...."अगं बाई...तुमच्या जाउ बाई म्हणजे माझ्या मावशीच्या नणंदेची सूनच की हो...."असे संदर्भ सापडायचे...:-)
शेवटच्या दिवशी मोठी यात्रा भरायची फुगे,खेळणीवाले,बत्तासे,चुरमुरे,गाठी ची दुकाने सजायची....जिकडेतिकडे पिपाण्यांचे आवाज घुमायचे...आजुबाजुच्या खेड्यातले शेतकरी लोकं आपल्या बायकापोरांसोबत तालुक्याला फेरी मारायचे..देवीचा आशीर्वाद घ्यायचे...
घाटावरला कार्यंक्रम संपला की आमच्या घरातल्या हळदीकुंकवाचा दिवस ठरायचा.त्या दिवशी दिवसभर आईची धावपळ चालायची...गौरीसाठी मोठ्ठी आरास बनवायला मी आणि माझी बहिण आईला मदत करायचो.आमची लहानपणीची खळणी,बाहुल्या,घरातल्या शोभेच्या वस्तु बाहेर निघायच्या..गौरीची बैठक सजायची....तिच्या समोर लाडु,चकल्या,शेव,शंकरपाळे असा फराळ मांडला जायचा.कलिंगडाचे झिगझॅग त्रिकोण कापत आई सुरेख कमळं करायची....मोगर्‍याचा घमघमाट सुटायचा...अत्तरदाणी,गुलाबदाणी,पातेलेभर डाळं,पन्हे अशी जय्यत तयारी केली जायची....मग आई मला छान चापुनचोपुन साडी नेसवुन द्यायची...
आलेल्या सगळ्या बायकांना हळदीकुंकु लावणे,अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे,डाळ-पन्हं आणुन देणे ही सगळी कामं मी आणि माझी बहीण वाटुन घ्यायचो...आणि मग सगळ्यात शेवटी आई त्यांची भिजवलेले हरभरे आणि काकडीने ओटी भरायची....
चैत्र आला की या सगळ्या आठवणी येतात..परत एकदा लहान व्हावसं वाटतं...कर्‍हाडच्या त्याच घरी जावंसं वाटतं..आता माझं माहेर कर्‍हाड हुन पुण्यात आलं...अजुनही माझ्या माहेरी आणि सासरी आम्ही चैत्रातलं हळदीकुंकु उत्साहनं साजरं करतो...पण कृष्णाबाईच्या छत्राखाली,तिच्या साक्षीनं केलेल्या "त्या" हळदीकुंकवांची सर ईथे पुण्यात नाही... अजुनही या सगळ्या जुन्या आठवणी मनाला हुरहुर लावतात..
माझ्या मनातला चैत्र अजुनही तिथेच फुलतो....घाटावर...कृष्णेच्या काठी...!!

Tuesday, February 17, 2009

चौघीजणी : मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ....एक साधे,सरळ,मनाला भिडणारे पुस्तक

पुस्तकाचं पहिलं पान उघडलं की आपण त्या दुनियेत हरवुन जातो....मेग,ज्यो,बेथ आणि ऍमि या चौघी बहिणी,त्यांचा मित्र लॉरी हे सगळे आपल्या जीवनाचा भाग वाटु लागतात..त्यांचं बालपण,त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या घटना,या सगळ्यात आपण हरवुन जातो....
माझे शालेय जीवन समॄद्ध करणार्‍या काही पुस्तकांपैकी चौघीजणी या पुस्तकाचा पहिला क्रमांक लागतो...लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या "लिटिल वुमेन" आणि "गुड वाईफस" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी " हा अनुवाद,प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यानी केलेला हा अनुवाद अतिशय सुंदर आहे.
अमेरिकेत राहणार्‍या मार्च कुटुंबातल्या चार बहिणी आणि त्यांचे परोपकारी आई वडील,त्यांचा शेजारी आणि मित्रा लॉरी आणि त्याचे आजोबा,या सर्वांच्या भोवती हे कथानक गुन्तलेले आहे...मार्च बहिणींचे वडिल सैनिक आहेत आणि ते युद्धावर गेले आहेत.मिसेस मार्च या सैनिकांसाठी चालवल्या जाणार्‍या ईस्पितळात काम करतात.एकेकाळी अतिशय श्रीमंती अनुभवलेल्या या घराची सध्याची परिस्थिती फारशी चांगली नाही...त्यामुळे मोठ्या दोघी बहिणी (वय वर्षे १६ आणि १५) पण नोकरी करुन घराला हतभार लावत आहेत..पण अशा परिस्थितीत सुद्धा त्या अतिशय आनंदात आहेत..
या चौघींच्या आयुष्यात लॉरी हा शेजारी राहाणारा मित्र येतो..लॉरी त्याच्या अतिशय गर्भश्रीमंत अशा आजोबांजवळ राहातोय..त्याचे आई वडील देवाघरी गेलेत...आणि त्याचे आजोबा त्याच्या वर जरी निरतिशय प्रेम करीत असले तरी हे प्रेम ते व्यक्त करु शकत नहियेत...हे प्रेम त्याला या चार बहिणी आणि मिसेस मार्च च्या रुपाने मिळतं...
प्रत्येक व्यक्तिरेखेचे अतिशय चपखल शब्दात वर्णन केल्यामुळे त्या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात...सुरेख देखणी खानदानी सौदर्य लाभलेली आणि मॄदु स्वभावाची मेग,काहिशी दांडगट आक्रमक आणि आपल्या बहिणींवर अतोनात प्रेम करणारी ज्यो,परोपकारी आणि लाजळू बेथ,बालिश असुनही मोठेपणाचा आव आणणारी छोटीशी गोडुली ऍमी,राजबिंडा दिलखुलास आणि या चारी मैत्रिणींवर जीव टाकणारा लॉरी....हे सगळे आपल्या आसपास वावरत आहेत असं आपल्याला वाटायला लागतं....
या सगळ्या लोकांच्या आयुष्यात घडणार्‍या छोट्या छोट्या घटना,बालपणातुन तारुण्यात जाताना घडणारी स्थित्यंतरे..अशी साधी सरळ अशी ही कथा...प्रसंगी हसवणारी,प्रसंगी रडवणारी आणि अनेकदा अंर्तमुख होउन विचार करायला लावणारी....कसलिही भाषणबाजी न करता अनेक गोष्टी शिकवणारी कथा शांताबाईंनी फार छान फुलविली आहे...बरेचदा तर ही कथा अनुवादित वाटतच नाही (अमेरिकन नावे सोडली तर)....इतकी ती आपल्यातली वाटते....
यातले अनेक प्रसंग आपल्यावर नकळत संस्कार करत जातात...आपला नाताळच्या दिवशीचा नाश्ता ह्युमेल्स कुटुम्बाला देउन स्वतं: दुध-पाव ची न्याहरी आनंदने करणार्‍या मार्च मुली,ऍमि वरचा राग विसरुन तिच्या आजारपणात रात्रंदिवस जागणारी ज्यो,मैत्रिणीच्या घरी रहायला गेलेली असताना अनेक चुकिच्या गोष्टी केल्याची मेगने आईला दिलेली कबुली,मुलींना सतत कार्यरत राहण्याचे महत्व पटावे यासाठी मिसेस मार्च ने केलेली युक्ती,वेळ वाया जाउ नये म्हणुन मुलिंनी स्थापन केलेला "मधमाशी क्लब",आनंदमेळ्यात ऍमि ने दाखवलेला दिलदारपणा,स्वत: आजारी असतानाही ह्युमेल्स कुटुंबाच्या मदतिला जाणारी बेथ...हे आणि असे किती प्रसंग सांगु ?
नातळ निमित्त बसवलेल्या नाटुकल्याच्या प्रसंगी मुलींची झालेली फजिती,लाजळु बेथ ला लॉरीच्या म्हातार्‍या आजोबांनी दिलेली भेट,मिस्टर मार्च च्या अचानक आगमनाचा ह्रदयस्पर्शी प्रसंग,मेग चे लग्न,पिकनिक्,ऍमिची युरोपवारी,मेगच्या संसारतील गमतिजमती, ज्यो ने रचलेल्या मजेदार कविताअसे कितितरी प्रसंग अतिशय आनंद देतात....तर बेथच्या आजारपणाचा भयानक प्रसंग,लॉरी चा प्रेमभंग,ज्यो चे अचानक आलेले एकटेपण हे सगळं वाचताना डोळ्यात पाणी कधी उभं राहतं कळंतच नाही...
काय काय सांगु आणि किति सांगु....सध्यातरी एवढंच म्हणेन कि तुमच्यापैकी ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्यानी शक्य असेल तेव्हा जरुर वाचा..आणि ज्यांनी वाचलं असेल त्याच्या आठवणी जाग्या होवोत हिच ईच्छा ....
अजुनही कधी कधी ऑफिस च्या कामाचा ताण आला,एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ झालं असेल,लाडक्या मैत्रिणींची आठवण आली ..किंवा ईतर काही ना काही कारण असो...मी हे पुस्तक उघडते...आणि क्षणभरासाठी सगळे ताण,सगळी दुखं दूर जातात...आणि मी या चौघींच्या जोडीला एक पाचवी होउन या पुस्तकात हरवुन जाते....
-स्मिता

Tuesday, February 10, 2009

सुरुवात...

रोज काहीतरी लिहावसं वाटत..अनेक विषय मनात घोळत असतात..कधी एखादी छानशी आठवण...कुठलसं प्रवासवर्णन....एखादी जमलेली कवीता...कागदावर उतरवावीशी वाटते..कधी मनातलं सलणारं दुखं....कधी एखाद्या गोष्टीचा आनंद...याचसाठी हा ब्लॉग....मनातलं सगळं सगळं व्यक्तं करण्यासाठी...