Monday, July 11, 2022

काश्मीर डायरीज - 3

 काश्मीर डायरीज - 3

16 मे 2022
सकाळी जाग आली तर दूरवर पावसाचा आवाज येत होता.. 6.15 ला उठले तेव्हा बाहेर व्यवस्थित पाऊस.. गोंधळ क्रमांक 2...🙄
मनात म्हणलं...झालं आता कल्याण.. कसलं काय मिनी स्वित्झर्लंड न काय.. बसा गुपचूप खोलीत टीव्ही बघत..
पण...
"अगर किसी चीज को आप शिद्दत से चाहो.. तो पूरी कायनात.. " वगैरे वगैरे.. असं खुद्द शाहरुख खानने आपल्याला सांगितलंय.. ते खरंच आहे बरका..😉
8 वाजता जादू झाल्याप्रमाणे पाऊस बंद....
एकदम स्वच्छ निळं आकाश आणि सूर्य महाराज नोकरीवर हजर...
सोमवार होता त्यामुळे बहुतेक लेट आले साहेब.. Monday Blues काय फक्त आपल्या सामान्य माणसालाच व्हावेत की काय ..😂
ते उन्ह बघून आमच्या गोटात एकदम आनंद पसरला आणि पटापट सगळं आवरून 6 मराठी वीर पहलगाम च्या घोड्यांवर बसायला तय्यार... 😎
वर पहलगाम चा घाट चढायला सुरू केले तसा रस्ता अधिकाधिक सुंदर होत होता. इनायत भाईंनी सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या.पोनी/घोडा स्टँड वर पोचून जमेल तितकं बर्गेनिंग स्किल वापरून ( तुळशीबाग ट्रेनिंग कामी आलं ) शिवाजीराजांचं नाव घेऊन आम्ही 6 जण घोड्यावर स्वार झालो.. "बैसरन" म्हणजेच मिनी स्वित्झर्लंड च्या दिशेने कूच केले...
प्रत्येकी 2 घोड्या सोबत 1 हेल्पर असे सोबत चालू लागले.. या पहाडात राहणाऱ्या लोकांचा स्टॅमिना बघून आश्चर्य आणि लाज वाटते राव.. पूर्ण 40-45 मिनिटांचा 6 किमी चा चढ असलेला डोंगर घोड्यांसोबत अगदी आरामात चढत होते ते लोक..आम्हाला घोड्यावर बसून घाम फुटला होता पण हे लोक अखंड गप्पा मारत चालत होते..
घोडा जरा डोंगराच्या टोकाला जायला लागला की आमची पाचावर धारण...पण ते भाईलोक एकदम निवांत
"अरे भाई इसको धरो, उसका पाय सटकेगा" भीतीमुळे हिंदी ची चिंधी होत होती...
"डरो मत दीदी, घोडेको भी उसकी जान प्यारी है" भाई एकदम निवांत..😄😄
माझ्या घोड्याचं नाव तर "सलमान".. त्याने भाईजान चे बरेच पिक्चर पण पाहिले असावेत.. सरळ चालायचं नावच घेत नव्हता भाऊ.. खड्डा दिसला की गेलाच तिकडे.... 😨😆
40 मिनिटे ही कसरत केल्यावर एक दगडी कमान आणि गेट दिसले.. तिकिटं काढून आत शिरलो आणि...
आहाहा.. सगळ्यांच्या तोंडून एकदम उद्गार निघाला...
विस्तीर्ण पसरलेलं हिरवगार पठार आणि त्याच्या चारही बाजूने बर्फ़ाचे डोंगर...
लहान मुलांसारखे पळत सुटावेसे वाटत होते... 🥰🥰
फोटो चा पहिला भर ओसरला.. मग जरा निवांत हिरवळीवर बसून आराम केला..
इतक्यात तिथे काश्मीरी कपड्याचे स्टॉल दिसले..
समस्त महिला वर्गाने "काश्मीर च्या कळ्या(?)" बनून मनसोक्त फोटो काढले.. 😍
पुरुष वर्गाला तसले कपडे न आवडल्याने त्यांनी स्वतःचे असे फोटो काढायला नकार दिला. ( शेजारीच एक काकु आणि काकांचे या विषयावर भांडण चालू होते.. काकांना अजिबात न आवडलेले कपडे त्यांनी घालावे म्हणून काकु मागे लागल्या होत्या.. तो सीन रिपीट होऊ नये म्हणून मग मी पण गप्प बसले..) 😉😆
रंगीत अल्युमिनियम टमरेल cum मटका, फुलांचा फ्लॉवरपॉट यासोबतच ससे, मेंढ्या असे जिवंत props हातात घेऊन आम्ही मनसोक्त फोटो काढले.. ( एकदा वेडेपणा करायचा ठरवला की पुरेपूर करावा नाही का..)
मग भुका लागल्यावर चहा, भजी, मॅगी खाऊन परतीचा रस्ता धरला..
उतरताना अजून जास्त मजा ( आमची मजा आणि घोडेवाल्यांची करमणूक ) करत खाली पोचलो..😇
त्या घोड्यावर तोल सांभाळत बसायचं, शिवाय आणि ढाल तलवार हातात धरायची आणि शत्रूला कापायचा ते पण अवघड अशा दऱ्याखोऱ्यात... इतके उद्योग महाराज आणि मावळे कसे करत असतील या विचाराने मनोमन एकदा शिवरायांना मुजरा घातला...🙏
पहलगाम मार्केट मध्ये एका बऱ्या हॉटेल मध्ये जेवण करून थोडीफार शॉपिंग केली ***.
आता पुढचे ठिकाण होते "बेताब व्हॅली" आणि "अरु व्हॅली"
इथे जाण्यासाठी लोकल टॅक्सी करावी लागते ती इनायत भाईंनी बघून दिली आणि बेताब ला निघालो...
टॅक्सी वाला फॉर्म्युला 1 रेस चा चाहता होता त्यामुळे भयानक वेगात "बेताब" होऊन गाडी चालवत होता.. 🙈
तिथे पोचलो तर भयंकर ट्राफिक जाम..
गाडीतून उतरून चालत चालत उतार उतरून खाली व्हॅली पर्यंत जावे लागले ( ट्रॅफिक जॅम नसता तर खालपर्यंत गाडी जाते) आणि तिथेच सगळा स्टॅमिना खलास झाला..
बेताब व्हॅली म्हणजे लीडर नदी जवळ पसरलेली एक सुरेख बाग आहे.. तिथे छोटे छोटे पूल आहेत, गझिबो आहेत, एक छोटा तलाव आहे, 2-3 गोड दिसणारी उतरत्या छपराची घरं आहेत,भरपूर फुलं आहेत.. ❤️
बेताब या हिंदी सिनेमा चं शूटिंग झालेलं ठिकाण म्हणून नाव बेताब व्हॅली...
तिथे पोचेपर्यंत बरेच चालावे लागल्यामुळे , आत गेल्यावर हिरवळीवर लोळायला सुरू केले.... पूर्ण व्हॅली बघायला 1-2 तास नक्कीच पुरणार नाहीत.. एक पूर्ण दिवस सुद्धा कमीच पडेल.. पण इतका वेळ आमच्या कडे नव्हता त्यामुळे जेवढं दिसलं त्यावर समाधान मानून तिथून बाहेर पडलो आणि काय..
गोंधळ क्रमांक 3..🙄
माननीय टॅक्सी चालकाने वर रस्त्यावर जिथे सोडले होते तिथे हाशहुश करत पोचलो तर महाराज गायब..त्याचा नंबर पण नाही जवळ.. मग इनायत भाईंच्या मदतीने त्याच्याशी संपर्क केला तर ट्रॅफिक क्लिअर झाले म्हणून साहेब सगळा उतार उतरून खाली जाऊन आमची वाट बघत बसले होते आणि आम्ही तोच सगळा चढ चढून वर येऊन त्यांची वाट बघत बसलो..
असो.... बडे बडे देशो मे छोटी छोटी गलतिया होती है ना.. ( रा. रा. शाहरुख खान परत एकदा .. बघा किती तत्वज्ञान असतं भारतीय सिनेमात..आणि लोक उगीच सिनेमाला नावं ठेवतात..) 😄
मग जरा गरमागरमी झाली ,आता थेट रूम वर जाऊ वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या.. पण पहलगाम च्या गार हवेने लगेच लोक शांत झाले आणि अरु व्हॅली ला एक चक्कर मारून येऊ असे ठरले...
अरु व्हॅली चा रस्ता म्हणजे रस्ताच होता...एकावेळी जेमतेम दोन लहान गाड्या जाऊ शकतील असा थोडा अरुंद रस्ता.. एकीकडे डोंगर, दुसरीकडे दरी आणि त्यातून वाहणारी लीडर.. पाईन ची झाडं, हिरवेगार डोंगर, मधून वाहणारे धबधबे, छोटी छोटी मातीची घरं,चरायला सोडलेल्या मेंढ्या, घोडे...नितांतसुंदर निसर्ग.... 🥰
त्या रस्त्यावरून अरु व्हॅली पर्यंत जाऊन परत येणे हा प्रवास अप्रतिम होता.. पण परत तेच.. वेळ कमी पडला.. असो..
आमच्या फॉर्म्युला 1 टॅक्सी वाल्याने सुखरूप पहलगाम टॅक्सी स्टँड ला आणले आणि इनायत भाईंच्या हाती सोपवले एकदाचे...
सुंदर आणि थकवणारा दिवस संपला होता..
हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन आणि अप्रतिम जेवण ( तिथं खाल्ली तशी फ्लॉवर ची भाजी मी आजवरच्या आयुष्यात कधीच खाल्ली नाहीये) जेऊन अंथरुणावर पाठ टेकली तरी घोड्यावर बसल्यासारखे वाटत होते...
***Travel tips -
-- काश्मीर स्पेशल खरेदीसाठी पहलगाम अतिशय स्वस्त आहे. पुढे श्रीनगर मध्ये बघू वगैरे अजिबात विचार न करता व्यवस्थित खरेदी करा.
"इधर डुप्लिकेट माल मिळता है याहा मत लो दीदी, मै आगे श्रीनगर मे आपको फॅक्टरी मे लेके जाता हु" असे कोणीही कितीही म्हणाले तरी कोणाचंही ऐकू नका.. बिनधास्त खरेदी करा.
-- मार्केट मध्ये पॅराडाइज हॉटेल च्या शेजारी गल्ली मध्ये सुंदर शाली,स्टोल आणि स्वेटर मिळाले. तेच पुढे श्रीनगर ला दुप्पट तिप्पट दरात होते.
-- क्रमशः






काश्मीर डायरीज - 2

 काश्मीर डायरीज - 2

15 मे 2022..
सकाळी 11 वाजता श्रीनगर मध्ये पोचलो.विमान उतरतानाचे दृश्य बघूनच शब्दशः "दिल गार्डन गार्डन" असं झालं... विमानतळावर पण जिथे जागा मिळेल तिथे हिरवळीचे तुकडे आणि त्यातून डोकावणारी गुलाबाची फुलं..
पुणे 34 डिग्री >> दिल्ली 40 डिग्री >> श्रीनगर 18 डिग्री असा टप्पा सुमारे बारा-तेरा तासात पार केला होता..
विमानतळावर उतरताच पहिल्यांदा जॅकेट चढवलं.
बाहेर आलो तर ट्रॅव्हल कंपनीचा माणूस हातात माझ्या नावाचा वेलकम बोर्ड घेऊन उभा होता...आपल्या नावाचा बोर्ड घेऊन माणूस उभा असायचा हा पहिलाच प्रसंग ☺️☺️.. मज्जाच वाटली...
हा माणूस म्हणजे इनायत भाई.. पुढचे 6 दिवस आमच्या सोबत असणार होता...
सगळं सामान पटापट गाडीत भरून आमचा प्रवास सुरु झाला तो पहलगाम च्या दिशेने..
"मंजिल से बेहेतर रास्ते" चा प्रत्यय काश्मीर मध्ये कुठेही प्रवास करताना येतो तसाच किंबहुना त्याहून सुंदर असा हा प्रवास होता..... रास्ते तर सुंदर होतेच पण मंजिल सुद्धा तितकीच सुंदर 🥰...
पहलगाम ला जाताना वाटेत केशराची शेते दिसली. म्हणजे सध्या केशराची फुलं नव्हती पण तरी दूरवर पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेतात जेव्हा केशराची जांभळी फुलं फुलत असतील तेव्हा किती सुरेख दृश्य दिसत असेल याची कल्पना करूनच मस्त वाटलं..
वाटेत जेवण आणि काश्मिरी कहावा चा आस्वाद घेऊन पहलगाम च्या दिशेने निघालो..
Welcome to Pahalgam ची कमान लागली आणि किती पाहू आणि किती नको अशी अवस्था झाली..
डावीकडे अखंड खळाळत वाहणारी लीडर नदी, आभाळाशी स्पर्धा करणारे पाईन चे वृक्ष, हिरवेगार डोंगर,चिनार आणि अक्रोडची झाडं असं सुरेख चित्र समोर उभं होतं... सुरवातीला उत्साहात दाणादण फोटो काढत सुटलो पण नंतर लक्षात आलं की हे दृश्य फोटोत मावणारच नाही.. मग गपचूप कॅमेरा आत टाकला आणि डोळ्यात साठवून घ्यायला सुरुवात केली..
साधारण 3 वाजता आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो..
Hotel Pahalgam Retreat..
लीडर नदीच्या काठी असलेले आणि हिरव्या डोंगरांचा नजारा दाखवणारे हे सुरेख टुमदार हॉटेल बघून प्रवासाचा सगळा शीण गायब...
लीडर च्या पाण्याचा खळखळाट अखंड ऐकू येत होता.. शुद्ध स्वच्छ हवा,हॉटेल समोर राखलेली सुरेख हिरवळ आणि त्यात फुलांचा उत्सव मांडला होता..
" किती रे तुझे रंग, किती तुझ्या छाया,
दोनच डोळे माझे, उत्सव जातो वाया"
अशी अवस्था..
दमून भागून आलेलो, जेवणामुळे पोट जड झालेलं पण खोलीत जाऊन झोपायची इच्छा होईना..
बाहेर बागेत रेंगाळत बसलो..
थोडा वेळाने समोर नदीवर जाऊन भरपूर फोटो काढले..
थोडेसे ढग होते ते बाजूला सरले आणि समोर थेट बर्फ़ाचे शुभ्र डोंगर दर्शन देऊ लागले.. आहाहा.. अजूनही डोळ्यासमोरून चित्र जात नाहीये...
सगळी संध्याकाळ तिथे घालवून मग रात्री हॉटेल मध्ये जेवण करून बाहेर आलो तर पौर्णिमेचा चंद्र समोर दिसत होता..
एखादा दिवस किती सुंदर असावा..
हा दिवस दाखवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानत आणि उद्याची सुंदर स्वप्नं बघत मऊ दुलईत शिरलो..
Travel tips -
-- पहलगाम अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही काश्मीर ट्रिप प्लॅन करताना यासाठी किमान 2 दिवस जरूर बाजूला ठेवा.
-- आमचे हॉटेल मूळ पहलगाम गाव/मार्केट च्या 12-13 किमी अलीकडेच पायथ्याला होते. वर मार्केट आणि गावात खूप गर्दी आहे. त्यापेक्षा खाली जास्त सुंदर शांत वाटले.
-- क्रमशः





काश्मीर डायरीज - 1

 काश्मीर डायरीज - 1

"आई आपण बर्फात कधी जायचं ?"
अगदी 5-6 वर्षांची असल्या पासून मधुजा प्रत्येक सुट्टी जवळ आली की आम्हाला म्हणायची.. एकदा अगदी सगळं ठरवता ठरवता काश्मीर ट्रिप फिसकटली होती..
त्यानंतर लांबतच गेली..
गेल्या 2 वर्षानंतर यावर्षी नक्कीच कुठेतरी मोठी ट्रिप काढू असं ठरलं आणि काश्मीर ला जायचंच असं म्हणून जानेवारी पासूनच "अभ्यास" सुरू केला 😎
विमानाचे दर, ट्रॅव्हल कंपनी चे वेगवेगळे पर्याय बघायला सुरुवात केली....भाऊ-बहिणी, मित्र मंडळी सगळ्यांना हाक दिली..हो नाही करत आमच्या सहा जणांचे जायचे ठरले आणि आमचं विमान आणि KHAB travels तर्फे पॅकेज बुक करून झालं..
आता रोज रात्री डोळे मिटले की एकच स्वप्न डोळ्यासमोर दिसत होतं...
काश्मीर.. पृथ्वीवरचा स्वर्ग..🥰
शॉपिंग,बॅग्स वगैरे वगैरे तयारी सुरू झाली.
आमची customized tour असणार होती त्यामुळे तिथे गेलं की कधी कसं फिरायचं ते आमचं आम्ही ठरवणार होतो..
वेगवेगळे ब्लॉग वाचून itinerary बनवली आणि ती 4 वेळा बदलून पण झाली.. 😉
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बर्फ दिसणार होता त्या गुलमर्ग केबल कार ची तिकीट्स बुक केली..
पण इतकं सगळं साधं सोपं नसतं देवा...
काहीतरी गोंधळ झाल्याशिवाय प्रवासाला कसली मजा..😆
पहिला गोंधळ पुण्यातच सुरू झाला...
जायच्या काही दिवस आधी आमच्या विमान कंपनी चा मेसेज आला की जायच्या दिवशीची flight cancelled..
सगळं प्लॅंनिंग चा बँडबाजा... रात्री अपरात्री च्या flights नको होत्या म्हणून मुद्दाम दिवसाची flight ठरवली होती तर नेमकी तीच कॅन्सल..
मग कस्टमर केअर ला 10 वेळा फोन.. विमानाचे नवे पर्याय असं करत करत दूसरे विमान बुक झालं...
आणि..
14 मे 2022...
Finally... आम्ही उडायला तयार होतो..
--- क्रमशः



Tuesday, June 22, 2021

दाल बाटी

 दाल बाटी


हा खास राजस्थानी प्रकार. खरतर ऑथेंटीक दालबाटी कशी लागते हे मी कधीच खाउन बघितलं नाहिये. पण दालबाटी आवडणारे लोक त्याचं कौतुक करताना थकत नाहीत म्हणुन बरेच दिवसांपासुन या प्रकार खाउन बघायची उत्सुकता होती.राजस्थान ची दाल बाटी, मध्यप्रदेश चे दाल बाफले, विदर्भातली वरण बट्टी हे सगळे भाउबंदच असं रेसिपी वाचताना लक्षात आलं.पण एकंदर कृती बघाता निखार्‍यावर भाजल्या जाणार्‍या या बाटी बद्दल जास्त उत्सुकता होती.
गेल्या लॉकडाउन मधे कराड मधे असताना आमच्याकडे पोळ्या करायला अनुराधा ताई नावाच्या एक गुजराथी मावशी यायच्या. कराड मधे खरतर खुप कडक लॉकडाउन चालु होता आणि ब्रेड,लादीपाव, पिझ्झा बेस,पाणीपुरीच्या पुर्‍या,भेळेच्या चटण्या, यीस्ट, क्रीम, चीज असे लक्झरी पदार्थ त्यावेळी तिथे अजिबात मिळत नव्हते.रोज रोज पोळी भाजी खाउन खाउन कंटाळा आलेला. फार फार तर इडली डोसे, भजी किंवा वडे.आणि इकडे पुण्यात लोक केक, बिस्किट, पाणीपुर्‍या, डाल्गोना कॉफ्या वगैरे चे फोटो रोज स्टेट्स ला टाकुन काव आणत होते.
तर या अनुराधा ताईंना एक दिवस सहज म्हटलं की वैताग आलाय पोळी भाजी खाउन काहीतरी वेगळं खायचय. त्यांनी विचारलं की मी तुम्हाला दालबाटी करुन देउ का ? कशी लागते माहित नाही पण थोड्या साशंक मनाने होकार दिला. त्यांच्या नॉनस्टॉप कॉमेंटरी सोबत ती दाल बाटी कशी बनते हे पाहिलं. त्यांनी बाट्या आप्पे पात्रात बनवल्या होत्या.
" तुम्ही किती नशीबवान बघा की ताई, तुम्हाला मी भेटले आता या लॉकडाउन मधे कामाला" असं त्यांच एक बेस्ट वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही. अशी स्वत: वर खुश असलेली माणसं आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी समाधानी असतात.
तर या दाल बाटी ची प्रेरणा अनुराधा ताई आहेत. रेसिपी मी अनुराधा ताई + इंटरनेट वरच्या काही अजुन रेसिपी अशी मिक्स केली आहे.

साहित्यः

बाटी:
२ वाट्या कणीक
३/४ वाटी रवा
१ चमचा दही
१/२ वाटी तुप ( हो वाटीच )
१ चिमुट सोडा
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ

दाल:
१ वाटी तूरडाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी मसुरडाळ
१/४ वाटी हरभराडाळ
१ उभा चिरुन कांदा
१ छोटा चिरलेला टोमॅटो
१ तमालपत्र
२ लवंगा
३-४ मिरे
२ चमचे बारीक चिरलेला लसुण
१ चमचा खिसलेलं आलं
२ उभ्या चिरुन हिरव्या मिरच्या
जिरे, कढिपत्ता, हिंग, हळद,मीठ, लाल तिखट्,कोथिंबीर
तेल्/तूप मिक्स ( संपुर्ण तूप पण छानच लागेल :-) )
गरम मसाला १/२ टीस्पुन

कृती :

बाटी -
बाटी साठी दिलेले सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. सर्व एकत्र केले की या पिठाचा मुटका झाला पाहिजे इतके तूप लागेल.(दिवाळीतल्या करंजीचे पीठ भिजवताना करतो तसे. ज्यांनी कधी करंज्या केल्या नाहियेत त्यांनी आपापल्या आई-आजी ला मुटका म्हणजे काय ते विचारा ) तूपात कंजुषी करु नये नाहितर बाटी चा अपेक्षित खुसखुशीतपणा साधला जात नाही.गरजेपुरते पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे आणि अर्धा तास झाकुन ठेवावे.
( रवा जाड असेल तर किंचीत जास्त पाणी घालुन मळावे आणि तासभर मुरु द्यावे.)
तासाभराने परत एक-दोन मिनिटे हे पीठ छानपैकी एकत्र मळुन घ्यावे आणि त्याचे लिंबाएकढे गोळे करावेत. गोळे करताना थोडे ओबडधोबड, चिरा राहतील असे करावे.
खुप गुळगुळीत नको. असे केल्याने बाटी आतपर्यंत मस्त बेक होते.
ओव्हन कन्व्हेक्शन मोड वर १८० डीग्री ला प्रीहीट करुन घ्यावा. आता सगळ्यात उंच रॅक अथवा बेकींग डीश मधे बाट्या मांडुन १८० डीग्रीवरती वरतीच २० मिनिटे बेक करावे. वरुन छान खरपुस तपकिरी रंग आला असेल. आता बाटी उलटुन परत १० मिनिटे सेम सेटींग वर बेक करावे.
बाट्या तयार.




दाल -
सर्व डाळी एकत्र करुन १/२ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात. त्यात मीठ, हिंग, हळद, चिरलेला कांदा, टोमॅटो घालुन कुकर मधे मौसुत शिजवुन घ्यावे.
कढई मधे तूप्/तेल एकत्र करुन त्यात जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, लसुन, मिरच्या, कढिपत्ता ची फोडणी करुन डाळ त्यात ओतावी.
खुप दाट वाटत असेल तर थोडे पाणी घालुन उकळी काढावी.



आता सगळ्यात चवदार आणि महत्वाचा भाग -

तुपाचा तडका -
३-४ चमचे साजुक तूप गरम करुन त्यात १/२ चमचा लाल तिखट घालावे आणि लगेच गॅस बंद करावा.

वाढणी -

खरतर ही भाजलेली बाटी असते तिला खाली उतरल्यावर तुपात अंघोळ घालायची असते म्हणे. पण माझं काही एकढ धाडस नाही झालं :-)

तर बाउल मधे २ बाट्या घेऊन त्यावर पातळ केलेले साजुक तूप घालावे. त्यावर गरम डाळ आणि वरुन तुपाचा तडका २ चमचे घाला.
गरम गरम आस्वाद घ्यावा.





Saturday, March 13, 2021

चिकन सुके/मसाला + रस्सा




मी ही रेसिपी जशी शिकले तशी स्टेप बाय स्टेप देते आहे.

मला अशी करायला आणि सांगायला पण सोपे वाटतेय.
त्यामुळे त्या त्या स्टेप मध्ये साहित्य लिहिलेले आहे

क्रमवार पाककृती: 

चिकन मॅरीनेशन -
चिकन 1/2 kg छोटे तुकडे
आले लसूण पेस्ट 2 चमचे
हळद 1/2 चमचा
लाल तिखट एक चमचा
मीठ 1/2 चमचा

चिकन ला सर्व मसाला चोळून 1 तास मॅरीनेट करून ठेवावे.

चिकन रस्सा -
1 मध्यम कांदा बारीक चिरलेला
खडा मसाला ( 2-3 लवंगा, 4 काळीमिरी , 1 तुकडा दालचिनी, 1 चक्रफुल , शाहाजीरे, 1 तमालपत्र )
सुके खोबरे खिसून भाजून 1/2 वाटी
कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
तेल 2-3 चमचे
मीठ
तिखट गरजेनुसार (मॅरीनेट करताना आधी घातलं आहे हे लक्षात ठेवून)
गरम पाणी

पातेल्यात तेल तापवून खडा मसाला आणि कांदा परतावा.
त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून मोठ्या आचेवर 2 मिनिटे परतावे.
चिकन बुडेल आणि वर एक पेर राहील इतके गरम पाणी घालून बारीक गॅस वर चिकन शिजवायला ठेवावे.
20-25 मिनिटात चिकन शिजते.
गॅस बंद करून झाकण घालून 10-15 मिनिटे मुरायला ठेवावे.
आता चिकन चे तुकडे बाजूला काढून घ्यावेत. ( हे आपल्याला चिकन मसाला करताना वापरायचे आहेत )
एखादा बोनी पीस रस्स्यात तसाच राहुद्यावा.

आता हा रस्सा परत बारीक गॅस वर उकळायला ठेवावा. त्यात कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आणि लागेल तसे मीठ घालावे.
यामध्ये भाजलेले खोबरे हाताने कुस्करून घालावे.

(खोबरे खमंग भाजून गार झाले की हाताने एकदम बारीक कुस्करता येते. मिक्सर ची गरज नाही. यामुळे रस्सा मध्ये इतर कोणतेही वाटण घालावे लागत नाही. )

व्यवस्थित उकळू द्यावे.
रस्सा तयार आहे.
वरून कोथिंबीर पेरावी ई ई ..

चिकन मसाला बनवता बनवता 1 वाटी भर रस्सा पिऊन घ्यावा. मसाला बनवायला अजून उत्साह येतो Wink

चिकन मसाला -
2 कांदे उभे चिरून
1 टोमॅटो
2 चमचे सुके खोबरे
5-6 लसूण पाकळ्या
1/2 इंच आले
कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
हळद
धने जिरे पूड 1 चमचा
मीठ,तिखट चवी प्रमाणे
तेल पाव ते अर्धी वाटी

कांदा, खोबरे, टोमॅटो 1 चमचा तेलावर खमंग परतून घ्यावेत.त्यात आले लसूण घालून बारीक वाटण करून घ्यावे.
तेल तापवून त्यात वाटण घालावे.
त्यात मसाले आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
मसाल्याला तेल सुटले की शिजवलेले चिकन चे पिसेस त्यात घालावे. त्यात एक डाव तयार रस्सा घालून 2/3 मिनिटे परतावे.चिकन मसाला तयार आहे.

चिकन मसाला, रस्सा , गरम पोळी, आणि तूप घातलेला इंद्रायणी भात अशा छान मेनू वर ताव मारावा.

आमच्याकडे सगळ्यांना हा गरम गरम रस्सा प्यायला फार आवडते.
चिकन चा सगळा अर्क उतरलेला हा गरमागरम रस्सा आणि भात म्हणजे सुख..

वाढणी/प्रमाण: 
2 जणांसाठी

रेसिपी by माझी मुग्धा काकू

Thursday, May 16, 2019

प्रिय सौ आज्जी आणि आजोबा,

आज तुमच्या लग्नाचा ६० वा वाढदिवस. ६० वर्ष हा खुप प्रदीर्घ काळ आहे.
एकमेकांना साथ देत, सांभाळत आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही पोचला आहात.

जेव्हापासुन मी तुम्हाला कळत्या वयात पाहात आले आहे तेव्हापासुनच कळत नकळत खुप सुंदर संस्कार तुम्ही आमच्यावर केलेत. एकाच गावात राहात असल्यामुळे तुमचा मनसोक्त सहवास मिळाला. आमच्या सगळ्या उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्या तुमच्या सहवासात अनेक नवीन गोष्टी शिकत गेल्या. तुमच्या दोघांच्या दिनचर्येचा जरी विचार केला तरी त्यातुन खुप काही शिकलो आम्ही.  पहाटे उठुन फिरणं, सडा रांगोळी, देवाची भांडी घासायची, प्यायचं पाणी भरायचं, मग अंघोळ, अजोबांची देवपुजा आणि आजीचा स्वयंपाक एकत्र आणि मग दोघांनी मिळुन गोड आवाजात महाराजांची पद म्हणणं . "सहजीवन" म्हणजे काय हे कुठेही लिहिलेलं पाठ करुन समजलं नसतं ते तुमच्या कृतीतुन आम्हाला समजलं.
अर्थात त्या वयात हे सगळं कळलं नव्हतं. पण आज मागे वळुन बघताना याचं महत्व जाणवतं.

१९६७ च्या भयानक कोयना भुकंपात घरदार सगळं मातीमोल झालेलं असताना सुद्धा पुन्हा कराड मधे येउन शून्यातुन सुरुवात करणं हे किती अवघड असेल. त्या भुकंपाच्या कथा लहानपणी मी अनेक वर्ष ऐकल्या , तुम्ही सगळे कसे छोट्याशा दरवाजातुन रांगत बाहेर आलात ई ई. तेव्हा ते थ्रिलींग वाटलं होतं ऐकायला. पण आज जेव्हा आम्ही पै पै जोडुन स्वतः च घर घेतलय तेव्हा मला कळतय की एका रात्रीत अचानक घर नाहीसं झाल्याचं दु:ख आणी वेदना काय असतील. पण त्यातुन सुद्दा तुम्ही एकमेकांच्या साथीने बाहेर पडलात.कराड मधे नवीन घर बांधलत.

तुमच्या घरी आलेला पाहुणा कधीही विन्मुख गेला नाही आणी अजुनही जात नाही. "अतिथी देवो भव" हे पुस्तकात नुसतं वाचुन कधी समजलच नसतं. तुमच्या सहवासात ते नकळत अंगी भिनलंय. कष्ट, सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर बेतलेले तुमचे सहजीवन बघुन आम्हा पुढच्या सर्व पिढ्यांना तुम्ही उत्तम वागणुकीचा आदर्श घालुन दिलाय. तुमचं न बोलता व्यक्त होणारं एकमेकांवरचं प्रेम आणि आदर आम्हाला नेहेमीच तुमच्याकडे बघताना जाणवतो.

श्री रामराया तुम्हा दोघांना उदंड आणि आरोग्यमय आयुष्य देवो
आणि आम्हाला असाच तुमचा भरभरुन सहवास मिळो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

तुम्हा दोघाना ६० व्या वाढदिवसाच्या खुप खुप मनापासुन शुभेच्छा. __/\__

Friday, November 23, 2018

जाणता राजा


निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।

नरपती, हयपती, गजपती,
गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि
शक्ति, पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत,
सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत, नीतीवंत
जाणता राजा।।

लहानपणापासून वेळोवेळी शाळेत इतिहासातून भेटत गेले महाराज.तेव्हा ते फक्त मार्कांपुरते माहिती होते. मग काही दिवसांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातून खरी ओळख झाली. हे पुस्तक वाचताना अनेकदा मी रडले असेन. महाराज आणि त्यांना जीव लावणारे त्यांचे सहकारी जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहायचे.कोणत्या मातीची बनली असतील ही वेडी माणसं असं नेहेमी मनात यायचं.

महाराजांची ती माझ्या मनातली प्रतिमा जशीच्या तशी प्रत्यक्षात आणली श्री. शंतनू मोघे  यांच्या शिवरायांनी. "स्वराज्य रक्षक संभाजी" या झी च्या मालिकेत त्यांना शिवरायांच्या भूमिकेत बघून हेच ते महाराज जे मी पुस्तकात "पाहिले" होते असं झालं माझं. अत्यंत उत्तम संवाद त्यांनी अगदी जिवंत केले. राजा कसा असावा हा महाराज आणि शंभूराजे यांच्यातला संवाद अगदी आमचे खरे महाराज बोलत आहेत की काय असे वाटावे.

गेले आठवडा भर सगळा इतिहास अक्षरशः जगले मी. असं वाटत होतं की तिकडे रायगडावर मी होते कुठेतरी महाराज बरे होतील अशी आशा मनात ठेवुन. काल शिवपर्व संपताना बघणं अशक्य झालं. समोर जे चाललंय ते खरंच चालू आहे असं वाटत होतं. काहीतरी चमत्कार व्हावा आणि राजे बरे व्हावेत अशी मनात प्रार्थना चालू होती.डोळ्यातल्या अश्रूंना बांध घालणं खरच अशक्य होतं.

 350 वर्षे मागे जाऊन इतिहास बदलता आला असता तर ?

सीरिअल मद्धे इतकं गुंतण्याची पहिलीच वेळ असेल ही.
शंतनू मोघे, अमोल कोल्हे आणि संभाजी ची सगळी टीम, तुम्ही स्वतः पण सगळा इतिहास जगलात आणि आम्हाला पण त्याचा भाग होता आलं. खूप आभार तुम्हा सगळ्यांचे. __/\__
- स्मिता श्रीपाद