Tuesday, July 22, 2025

कुमाऊंच्या प्रदेशात - १.......नैनिताल कडे

 कुमाऊंच्या प्रदेशात - १.......नैनिताल कडे

“नेमेचि येतो मग उन्हाळा आणि उन्हाळ्याची सुट्टी”
('नेमेचि येतो मग पावसाळा' असं आजकाल आपण म्हणू शकत नाहीये कारण सध्या पावसाचा काहीच नेम नाहिये.. मनात येइल तेव्हा सुरु.....)
कुठे जायचं या सुट्टीत ? असं विचारमंथन फेब्रुवारी पासून सुरु झालं. गेल्या वर्षी काश्मिर झाल्यामुळे परत एकदा हिमालयाच्या जरा जवळ जाउन येउ असं वाटायला लागलं होतंच. आमच्या सुट्ट्या मे मधे. अगदी ऐन उन्हाळा असल्यामुळे थंड ठिकाणी जायचं हे ठरलंच होतं.पण कमीतकमी दगदग, सोपा प्रवास, निसर्गरम्य असणारं ठिकाण पाहिजे, खिशाला पण झेपलं पाहिजे अशी अखूडशिंगी बहुगुणी गाय कशी शोधायची बुवा?
मग पार सिक्कीम, दार्जिलिंग पासून सुरु करून धर्मशाळा, डलहौसी याव नि त्याव असे सगळे पर्याय शोधत खूप अभ्यास करून एकमताने(माझ्या) यावर्षीचा प्लॅन ठरला.
"नैनिताल,रानीखेत, जिम कॉर्बेट". ब्लॉग आणि इंटरनेट शोधून मला हवी तशी आयटीनेररी बनवली.
कोण येतंय का सोबत ? अशी मित्रमंडळींना हाळी घालून झाली पण यंदा आमच्या आणि त्यांच्या तारखा जुळेनात. मग अचानक एक नवीन प्रयोग जो इतके वर्ष टाळत होतो तो करायचा विचार सुरु केला. तो म्हणजे एखाद्या ट्रॅवल कंपनी सोबत ग्रुप टुर.
मग वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनी चे ब्रोशर गोळा केले आणि मग मला मी बनवलेला प्लॅन जास्तच भारी वाटायला लागला 😜. ( कोणाला हवा असेल तर नक्की सांगा.I will be happy to share)
पण मग 'स्वतः ला हवा तास प्लॅन पण आम्ही तिघेच' की 'विमान तिकिट्स,हॉटेल बुकींग्स्,फिरायला कार ई सकट सगळं तय्यार असणारी ग्रुप टूर' यात निवड करावीच लागणार होती. शेवटी यावेळी सर्वानुमते दुसरा पर्याय ठरवला. आम्हाला हव्या असणाऱ्या तारखांना उपलब्ध असलेली केसरी ची टूर बुक करून मोकळे झालो.
गेल्या वर्षीचा काश्मीर चा अनुभव गाठीशी होता त्यामुळे यावेळी शॉपिंग आणि पॅकिंग थोडं सोपं झालं. उत्तरेकडे उन्हाळा असं गुगलबाबा दाखवत असले तरी आपल्या साठी त्यांचा उन्हाळा म्हणजे थंडी च असते याचा जुना अनुभव होताच त्यामुळे गरम कपडे, कधी पण पडणाऱ्या पावसासाठी छत्री असा सगळा जामानिमा तयार होता.
हव्या त्या तारखेला कमी पैशातलं विमान शोधा, बुक करा, हॉटेल्स चे रिव्यु बघा आणि बुकिंग करा, तिथे फिरायला गाडी शोधा, रोजचा फिरायचा प्लॅन बनवा असं काही म्हणजे काहीच काम यावेळी नव्हतं त्यामुळे मला चुकल्याचुकल्यासारखं व्हायला लागलं होतं खरतर.
टूर च्या 8 दिवस आधी व्हाट्स अप ग्रुप तयार होईल आणि विमानाची तिकिटे आणि बाकी सुचना तिथेच मिळतील असं बुकिंग च्या वेळी सांगण्यात आलं होतं.पण ट्रीप चार दिवसांवर आली तरी केसरी ऑफिस कडुन एक पण फोन नाही. म्हणलं कॅन्सल झालं की काय सगळंच ? त्यांच्या कस्ट्मर केअर ला फोन केला तर ते 'तुम्हाला २ दिवस आधी येइल फोन. वाट बघा' असं म्हणत होते. केसरी ची सगळी बुकींग डॉक्युमेंट्स काढुन वाचली. त्यात एके ठिकाणी एक अशा अर्थाचं वाक्य लिहिलेलं होतं की "No phone means all is well" म्हणलं ओके. बघु वाट. बॅग तर तयार आहेत पण हातात विमान तिकीट्स, हॉटेल बुकींग काहीच नाही त्यामुळे माझ्या मधल्या प्लॅनर ला जरा अस्वस्थ झालं होतं. आणि खरंच आदल्या दिवशी २ फोन आले. एक केसरी ऑफिस मधुन विमानासंदर्भात आणि एक आमच्या टुर मॅनेजर्/गाईड/केसरीचा आपला माणुस अभिषेक चा दिल्ली मधुन. आता ट्रीप चे खरे वेध लागले आणि....
२ मे पहाटे ४:४० ला पुणे विमानतळावरुन दिल्ली च्या दिशेने आम्ही उड्डाण केलं....
दिल्ली मधे पोचता पोचता अभिषेक चा मेसेज येउन पडला होता की आमच्या सोबत मुंबई चे पण लोक आहेत आणि त्यांचं विमान आमच्या नंतर एक तासाने पोचेल. तोवर बाहेर दिल्ली च्या गरमीत येण्यापेक्षा आतच थांबा.मग दिल्ली विमानतळावर थोडं फ्रेश झालो, खाऊन घेतलं.तिथेच मस्त ऐसपैस लाउंज चेअर पकडुन त्यावर जरा पाठ सरळ करुन घेतली.बरोबर ९ वाजता अभिषेक चा फोन आला की मुंबई वाले पोचले आहेत. आता तुम्ही सगळेजण बाहेर पार्किंग पाशी येउन मला भेटा. बाहेर पडलो तर अभिषेक केसरी चा झेंडा घेउन आमचे स्वागत करायला तयार होताच.त्यांच्या कडुन आमच्या नावचे टॅगस घेउन बॅगांना लावुन टाकले आणि बस ची वाट पाहात बसलो.
अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असलेली आमची बस दिल्ली च्या दिव्य ट्रॅफिक मुळे अर्धा तासाने पोचली. तोवर आमच्या सोबत कोण कोण मंडळी आहेत, त्यांची आणि आमची कुंडली जुळू शकेल की नाही याची चाचपणी सुरु केली 😉. केसरी ने दिलेली ३० सीटर बस मस्त वातानुकुलीत होती. पुणे आणि मुंबई चे मिळुन आम्ही २० जण या बस मधे बसुन नैनिताल च्या दिशेने रवाना झालो. दिल्लीतुन बाहेर पडता पडता जमेल तेवढे दिल्ली दर्शन झाले. ईंडीया गेट आणि राष्ट्रपती भवन दर्शन बसमधुन करुन झालं आणि हायवे ला लागता लागता रात्री १ पासुन जागे असलेले आम्ही सर्वजण "ये ग गाई गोठ्यात" करत कधी झोपलो समजलं सुद्धा नाही.
१२ वाजता "गजरौला" इथं जेवण्यासाठी बस थांबली तेव्हाच जाग आली.डोळे उघडले तेव्हा " मै कौन हु ? मै कहां हु ?" मोड मधे सगळेजण होतो. "बिकानेरवाला" नावाच्या हॉटेल मधे जेवणाचा पहिला ब्रेक होता. व्यवस्थित जाग आल्यावर भुकेची जाणीव झाली. केसरी मधे टुर बुक केली तेव्हा केसरी सोबत आधी जाउन आलेले लोक म्हणायचे की केसरी मधे खाण्यापिण्याची खुप रेलचेल असते. त्याची प्रचिती पहिल्याच जेवणाला येत होती.त्यांनी निवडलेलं हॉटेल आणि तिथलं जेवण दोन्ही मस्तच होतं. बिकानेरवाला मधली भरगच्च पंजाबी थाळी जेवुन उरलेली झोप पुर्ण करायला परत एकदा गाडीमधे बसलो.आता भरल्या पोटी अजुनच मस्त झोप लागली ते थेट चहा साठी गाडी थांबली तेव्हा जाग आली. खाली उतरुन पाहिलं तर मुख्य हायवे सोडुन गाडी पहाडाच्या दिशेने निघाली होती. काठगोदाम च्या अलिकडे कुठेतरी आम्ही थांबलो होतो.
आतापर्यंत झोप पुर्ण झाली होती पण आता गाडीत बसुन सगळेच कंटाळलो होतो. काठगोदाम च्या जवळ जबरदस्त ट्रॅफिक जाम मुळे खुप वेळ गेला. आता अरुंद रस्ते आणि डोंगर सुरु झाला होता. एकिकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी, दरीमद्धे सुकलेल्या नद्या आणि त्यामुळे उघडे पडलेले पांढरेशुभ्र दगड्गोटे दिसत होते. दूरवर डोंगरांच्या रेषा दिसत होत्या. तिथला निसर्ग एकाच वेळी सुंदर आणि भीतीदायक वाटतो. चारधाम ला जाणारी वाट हीच आहे आणि पुढे यापेक्षा अवघड आहे म्हणे. हे ऐकल्यावर तिथुनच चारी धाम ना हात जोडले.
इकडे पाउस पडुन गेल्याच्या खुणा दिसत होत्या त्यामुळे हवा चांगलीच गार लागत होती. डोंगर संपतच नव्हते. एक उतरला की पुढचा. नैनिताल च्या येण्याकडे एकुण ४० जण त्यांचे 'नैन' लावुन बसले होते. अखेर संध्याकाळी ६-६:६० च्या दरम्यान आमच्या हॉटेल मधे पोचलो.
आजचा पहिला दिवस प्रवासात गेला होता. आमचं हॉटेल खुद्द नैनिताल मधे नव्हतं तर नैनिताल जवळ भवाली नावचं एक दुसरं ठिकाण आहे ( आपल्या महाबळेश्वर-पाचगणी सारखंच) तिथे होतं.
आमच्या बॅग्स त्यांना लावलेल्या टॅग्स वरुन आमच्या रुम मधे पोचत्या केल्या गेल्या. काल रात्री १२ नंतर तब्बल १८-१९ तासांनी आता संध्याकाळी ७ वाजता गादीला पाठ टेकवली. नैनिताल मधे गेले ३ दिवस भरपुर पाउस पडुन गेला होता त्यामुळे हवा प्रचंड गार होती. उद्या पण 'बारीश की आशंका' व्यक्त केली होती. थंड हवेसाठी आलो होतो तर पाउस पण फ्री मधे मिळणार होता बहुतेक 😉
थोडा आराम करुन, फ्रेश होउन डायनिंग रुम मधे जेवायला गेलो. सुंदर वास सुटले होते. थंड हवे मुळे कडकडुन भुक पण लागली होती. अप्रतिम चवदार जेवणाचा बुफे तयार होता.अर्धं जेवण झाल्यावर शेफ महाराज त्या रुम मधे प्रकटले.त्यांच्याशी हिंदी मधे 'खाना अच्छा है' वगैरे सुरु केलं तर ते अभिषेक सोबत मस्तपैकी मराठीत गप्पा मारायला लागले. केसरी सोबत नेहेमी स्वत: चा शेफ असतो असं कळलं होतं पण आमच्या बस मधे अभिषेक सोडुन कोणी शेफ वगैरे दिसलं नव्हतं.तर हे शेफ बुवा केसरी चेच निघाले आणि मुंबईहुन आले होते असं कळलं. सिझन मधे ३ महिने ते तिथेच रहातात असे त्यांनी सांगितले. त्यांच्या हातच्या जेवणासाठी आणि एकंदरच केसरी च्या सगळ्याच जेवणांसाठी वेगळी पोस्ट टाकावीच लागेल. असं एका वाक्यात सांगता यायचं नाही.
जेवण करता करता उद्याच्या प्लॅन बद्दल अभिषेक ने सुचना दिल्या. ७ वाजता वेकअप कॉल, ८ ला नाष्टा, ९ ला फिरायला बाहेर असं फिक्स टाईमटेबल सांगितलं.
गरम गरम सुग्रास जेवण जेवुन शेफ ना धन्यवाद देत रुमवर परत आलो.
उद्या पाउस येइल का ? स्नो व्यु पॉईंट वरुन हिमालय रांगा दिसतील का ? नैनी लेक मधे फिरायला मिळेल का ? असे प्रश्ण सध्यासाठी बाजुला ठेवुन, रुम मधला हीटर चालु करुन गुडुप झालो.

No comments:

Post a Comment