Tuesday, July 22, 2025

वर्तुळ

 वर्तुळ


"गायक मंडळी तयार ना ? आपापल्या जागा घेउन बसा."
"साउंड चेक करा रे.. डाव्या मॉनिटर मधून आवाज येतोय ना व्यवस्थित ?"
"पाहुणे दीपप्रज्वलनासाठी गेले आहेत. २ मिनिटात पडदा वर घेतोच आहोत"
"रेवती आणि श्रद्धा ताई आल्या का? नांदी सुरु होतेय म्हणाव त्यांना"
"आसावरी ताई, मला प्रत्येक गाण्याच्या आधी चा क्लु सांगा बरं का"
"पण मी कसं सांगणार? माईक आहे माझ्या समोर"
"अहो सोपं आहे.. लहानपणी आपण कॉपी करताना कसं पेपर तिरका धरुन उत्तरावर हळूच बोट ठेवायचो तसं त्या प्रिंटआउट वर गाण्याच्या नावापुढे बोट ठेवुन दाखवा"
"पण मी केलीच नाहीये कॉपी कधी"
"काळी ५ असेल तेव्हा मी पाच बोटं धरुन केसांकडे हात दाखवेन चालेल ना? पण माझे काही केस पांढरे आहेत त्यामुळे काळी की पांढरी ५ कसं कळणार?"
हे आणि असे अनेक संवाद मोजुन शेवटच्या साठ सेकंदात घडत होते. पोटात आलेला मोठ्ठा गोळा मधेच घडणार्या विनोदामुळे इकडे तिकडे पळत होता.
" ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पालक अभिव्यक्ती गट सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे..." असे शब्द कानावर पडले आणि मी शांतपणे डोळे मिटुन एक दीर्घ श्वास घेतला.
प्रांजल दादा च्या सिंथेसायझर वर नांदी ची पहिली लकेर उमटली आणि गेल्या २ महिन्यातली सगळी धावपळ शांत करणारा पहिला स्वर सुरु झाला....
"जाणुनिया अवसान नसोनि,
महत्कृत्य भर शिरी घेतो"
चा खराखुरा अर्थ त्याक्षणी कळत होता.आत आत झिरपत होता. नकळत एक चुकार अश्रु ओघळलाच आणि हात जोडले गेले.सांभाळुन घे रे बाबा.
पुढं काय झालं काही आठवत नाही. पुढचे दोन अडीच तास कापरासारखे उडुन गेले.शनिवार संध्याकाळपासुन आजुबाजुला पसरलेली जादु अजुन कमी झाली नाहिये.
रात्री डोळे मिटले तरी स्टेज वरचे सुंदर क्षण डोळ्यासमोर येतायत आणि कानात टाळ्या घुमतायत. मोबाईल उघडला की अजुनही कौतुकाचे संदेश डोकावतायत.
गेल्या वर्षी ज्ञानप्रबोधिनी च्या पालक अभिव्यक्ती चे गायन, वादन, लेखन, चित्रकला, नृत्य असे अनेक गट तयार झाले होते. कलेचा समान धागा सर्वांना एकत्र घेउन आला. गेल्यावर्षीच्या एप्रिल मध्ये एक आणि गणेशोत्सवात एक असे लहान प्रमाणावर दोन कार्यक्रम या गटाने केले होते आणि कदाचित तिथुनच या प्रवासाची सुरुवात झाली. सर्व अभिव्यक्ती प्रमुखांनी बैठक घेउन सर्वानुमते यावर्षीचा विषय ठरवला "शोध महाराष्ट्राचा" आणि सगळे गट कामाला लागले. डिसेंबर महिन्यात सर्वात आधी काम सुरु झालं ते लेखन गटाचं. आमच्या लेखन गटाची म्होरक्या आसावरी ताई ने सर्व लेखकांना प्रोत्साहन देउन त्यांच्याकडुन उत्तम साहित्य जमा केलं. महाराष्ट्राशी संबंधीत लेख, कविता, नाटिका मागवल्या गेल्या आणि हळुहळु कार्यक्रमाला मूर्त रुप यायला लागलं. जेवढं शक्य होईल तेवढं सगळं साहित्य आपण स्वतः लिहायचं असं आधीच ठरलं होतं.
लेखन गटावर ऋचा ने 'महाराष्ट्रातील नद्या' असा विषय घेउन कविता लिहिल्या तेव्हा त्यांची सुंदर गाणी तयार होतील अशी कल्पना आम्ही कोणीच केली नव्हती. पण आमच्या गुणी गायन अभिव्यक्ती प्रमुख सायली आणि दीपाली ताईंनी त्यांना सुंदर चाली लावल्या आणि त्यांची गाणी बनली. ती गाणी इतकी सुरेख होती की नृत्य अभिव्यक्ती प्रमुख श्रद्धा ताई ला त्यात सुंदर नृत्य सापडलं नसतं तरच नवल. महाराष्ट्रातल्या अवखळ नद्या स्टेज वर अवतरल्या आणि सगळ्या प्रेक्षकांना त्यांनी ठेका धरायला भाग पाडलं. गायन गटावर हौशी गायकांना साद घातली आणि त्याला मस्त प्रतिसाद मिळाला. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात साधारण आराखडा तयार होउन गायन आणि नृत्य गटाच्या सरावाची सुरुवात झाली सुद्धा.तबला, हार्मोनियम च्या जोडीला सिंथेसायझर ची साथ देण्यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास आमच्या साठी वेळ काढून प्रांजल दादा पण तयार झाले. रेवतीच्या छोट्या निनाद ने सर्व सरावांच्या वेळी हार्मोनियम ची उत्तम साथ दिली.
या सगळ्याला समांतर नाटिका लेखन देखिल चालु होतंच.मार्च उजाडला तसं अनेक नवनवीन गोष्टी आकार घेउ लागल्या.इतिहास, शेती, भाषा, खाद्यसंस्कृती, क्रीडासंस्कृती अशा विविध विषयांना स्पर्श करणारं लिखाण जमा झालं आणि अमेय दादांच्या मार्गदर्शनाखाली नाटिका आणि अभिवाचन सराव सुरु झाला.सर्व लिखाणाला एकत्र जोडून देणारं सुंदर निवेदन हेमांगिनी ने तयार केलं आणि दोन तासाचा एकसंध कार्यक्रम तयार झाला.
हॉल बुक करणे, आपल्या कार्यक्रमाचे फ्लायर बनवणे, स्टेज वर मागे PPT स्वरुपात काही फोटो/प्रसंग दाखवणे ही सगळी कामे आणि दर शनिवार रविवार चा जोरदार सराव सुरु झाला.
कधी एखाद्या सोसायटीच्या हॉल मधे तर कधी कोणाच्या घरी सराव पार पडले. या सगळ्या प्रवासात अतिशय गोड मैत्रिणी भेटल्या आणि आपापले रोजचे पोटापाण्यासाठी करावे लागणारे व्याप सांभाळुन सोबत एखादी कला नुसती जोपासली असं नाही तर त्यात प्राविण्य प्राप्त केलेली अत्यंत गुणी मंडळी भेटली.गायन आणि लेखनाव्यतिरिक्त PPT आणि फ्लायर च्या निमित्ताने काही नवीन तांत्रिक गोष्टी देखिल मला शिकता आल्या.( Canva शिकवणारे माझे गुरु मिलिंद दादा यांना अजुनही चहारुपी दक्षिणा बाकी आहे हे माझ्या लक्षात आहे 😉. आनंद दादांसोबत PPT आणि फ्लायर चे काम करताना ते किती मोठे कलाकार आहेत हे त्यांनी कधीही जाणवुन दिले नाही. त्यांची कमाल लाइव्ह पेंटींग द्वारे कार्यक्रमादिवशी पाहिली तेव्हा थक्क झाले.स्वत: मोठे कलाकार असुनही पाय जमिनीवर घट्ट रोवुन उभं राहणं सगळ्यांनाच जमत नाही. जास्त गाजावाजा न करता मोजक्या स्वयंसेवकांना हाताशी धरून चोख नियोजन कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दुहिता ताई ने दाखवून दिलं. अगदी समई, तांब्याभांड्यापासून प्रत्येक गरजेची वस्तू बॅकस्टेज ला हजर होती आणि वेळेत सापडत सुद्धा होती.
आत्तापर्यंत सगळं छान लिहिलंय म्हणजे सगळं सोप्प होतं असं नव्हे. अडचणी पण भरपूर आल्या पण आशुतोष दादा, मिलिंद दादा, प्रसाद दादा, अमेय दादा, आनंद दादांसारखे लोक सदैव तत्पर राहून त्यावर मार्ग काढायचं काम चोख करत होते.
कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, संगीत, नृत्य असं सबकुछ प्रबोधिनी असलेल्या या कार्यक्रमाची सगळी निर्मिती प्रक्रिया मला जवळून बघता आली. खूप काही नवीन शिकता आलं. आसावरी ताईचं बोट धरुन मी इथे सामिल झाले आणि या सगळ्या सुंदर प्रक्रीयेचा भाग झाले त्यासाठी मी तिची कायम ऋणी राहीन.
अजून उत्तम करायला भरपूर वाव आहे. अजूनही सुधारणा करत पुढचे कार्यक्रम करत राहूच पण पहिलं वहिलं अगदी खास असतं आणि ते कायम स्मरणात राहावं म्हणून लेखणीतुन व्यक्त झालंच पाहिजे. लिखाणामुळे मी या सगळ्याशी जोडले गेले होते ते 'वर्तुळ' पूर्ण करायला नको का !!
©️स्मिता श्रीपाद
18 एप्रिल 2023

No comments:

Post a Comment